यावलला महास्वच्छता अभियानाचा उडाला बोजवारा

0
14

साईमत, यावल : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि यावल नगरपालिकाच्या प्रभारी प्रशासक म्हणून असलेल्या आयएएस महिला अधिकारी देवयानी यादव यांच्या आणि यावल नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या कार्यक्षेत्रात ५ जानेवारी ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावल शहरात ठराविक ठिकाणी स्वच्छता अभियान करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असेल. परंतु यावल शहरात आजही अनेक ठिकाणी महास्वच्छता अभियानाचा बोजवारा कसा उडाला हे प्रत्यक्ष दिसून येत आहे. त्यामुळे न.पा.चा कारभार प्रशासक अन्‌ प्रभारी कारभारामुळे विस्कळीत झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

अभियाना अंतर्गत राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन विकास मंत्री गिरीश महाजन यांनीही बऱ्याच ठिकाणी उपस्थित राहून श्रमदान केले. परंतु यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध विकास कामांसाठी निधी आणला आणि तो खर्चही केला. अनेक कामांची गुणवत्ता दर्जा हा विषय वेगळा असला तरी यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन सुविधा ज्या पुरविल्या जात आहे. त्या सुविधांचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. यावल शहरात आजही विकसित भागात मोकळ्या जागांवर घाणीचे, केर कचऱ्याचे, बांधकाम साहित्याचे ढीग साचलेले आहेत, गटारीची नियमित साफसफाई केली जात नाही. झाडू मारणारे ठराविक ठिकाणी साफसफाई करतात. घंटागाडी दोन दिवसाआड फिरत असल्याने नागरिकांना दुर्गंधीयुक्त, ओला व सुका कचरा घरात कचराकुंडीत ठेवावा लागत आहे. ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण केले जात नाही. मुख्य रस्त्यावर, भर रस्त्यात अतिक्रमण झाले आहे आणि होत असल्याने वाहतुकीमुळे सर्व स्तरातील नागरिकांना रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम अभियंता कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहत नसल्याने तसेच सुरू असलेले काम मंजूर प्लॅन इस्टिमेटप्रमाणेच होत आहे किंवा नाही त्याचीही खात्री न करता ठेकेदार त्याच्या सोयीनुसार मोजमाप करून इस्टिमेट नगरपरिषद बांधकाम विभागाला सादर करतात आणि त्या दाखल मोजमाप पुस्तकेनुसार बिल काढले जात आहे. ठेकेदारांच्या आर्थिक व्यवहारात टक्केवारी निश्‍चित ठरलेली असल्यामुळे कामे पूर्ण न करता वेळेवर बिल काढले जात आहे.

भुसावळकडून येताना यावल शहरात प्रवेश करताना यावल येथे भुसावळ जुन्या नाक्याजवळ वळणावर यावल शहरातील घाण पाणी व पाईपलाईनचे पाणी एका ठिकाणी साचून मिनी बंधाऱ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि यामुळे एखाद्या वेळेस मोठी अप्रिय घटना घडू शकते. हे यावल नगरपरिषद आणि बांधकाम विभागाला दिसून येत नसल्यानेही नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.हे दृश्‍य बघितले असता यावल नगरपालिकेने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने महास्वच्छता अभियानाचे १२ वाजविले नाही का..? आणि केंद्र व राज्य सरकार सह जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाची पायमल्ली झालेली नाही का..? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे..?

नगरपालिकेवर प्रशासक राजवट असल्याने काही माजी अध्यक्ष आणि अनेक माजी सदस्य, सत्ताधारी विरोधी पक्षाचे समर्थक असले तरी ते गप्प बसून आहेत. तसेच गेल्या दीड ते दोन वर्षांपासून यावल नगरपालिकेचा कारभार प्रशासक आणि प्रभारी कारभारामुळे ९० टक्के विस्कळीत झाला आहे. याकडे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी लक्ष केंद्रित करून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत पोपट पंछी न करता, जास्त न बोलता प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी यावल शहरातून सर्व स्तरातून मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here