भाजपाशी युती करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
10

मुंबई ः प्रतिनिधी

पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घ्यायला सुरुवात केली आहे. आधी येवला, मग बीड आणि आता कोल्हापुरात शरद पवारांची सभा होणार आहे. येत्या 25 तारखेला कोल्हापुरातील दसरा चौकात शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या सभेतून शरद पवार काय भूमिका मांडणार? कुणावर टीका करणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. शरद पवारांच्या कोल्हापुरातील सभेबाबत प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला जे योग्य वाटते, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रशासनावर पकड असणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही कुणालाही खासगीत विचारा आम्ही आमचा टेंभा मिरवतोय, असे कृपा करून समजू नका. शेवटी सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राबवायची असते. काही वेळेस विचारधारा वेगवेगळी असू शकते, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपाशी युती करण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीशिवाय घेतला का? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करायचा असतो. लोकशाहीची हीच खरी पद्धत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, 2019 मध्ये सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:ची विचारधारा बाजुला ठेवून शिवसेनेबरोबर आघाडी केली. शिवसेना आणि भाजपा 25 वर्षांपासून मित्रपक्ष होते. भाजपाबरोबर 25 वर्षे युती केलेला मित्रपक्ष अडीच वर्षे चालू शकतो. तर मग पुढच्या काळात युतीतील दुसरा राहिलेला मित्रपक्ष (भाजपा) तोही चालून घेतला पाहिजे. त्यामुळे आम्ही शरद पवारांपेक्षा काही वेगळी भूमिका घेतलीय, असे दाखवण्याचे काही कारण नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here