साईमत/ नवी दिल्ली
राज्यात सध्या हवामानात लक्षणीय बदल जाणवत असून उकाडा कमी होऊन दमट वातावरण निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार असला तरी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. धाराशिव व लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीटीसह पावसाची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. कोकण विभागात मात्र उष्ण व दमट हवामान कायम राहणार असून मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी परिसरात उकाडा अधिक जाणवणार आहे.
विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता असून वादळी पावसाचा धोका कायम राहणार आहे.
दरम्यान, भंडारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भंडारा, तुमसर आणि मोहाडी परिसरात अवकाळी पावसामुळे भातपीक कापणीला आलेले शेत जमिनीवर आडवे पडले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मका आणि आंबा बागायती पिकांनाही फटका बसला आहे.
या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. प्रशासनाने नागरिक व शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
