घरकुल योजनेत खरा लाभार्थी वंचित, दुसऱ्याने लाटले अनुदान
रावेर (प्रतिनिधी)-
तालुक्यातील निरूळ येथे आवास योजनेत कागदोपत्री लाभार्थी असलेल्या गणेश शिंदे यांच्या घरी ग्रामपंचायतीचा शिपाई घरकुल पूर्ण झाल्याची पाटी लावून फोटो काढण्यासाठी पोहोचला, तेव्हा हा खरा लाभार्थी वंचित व दुसऱ्याने अनुदान हडपल्याचा घोटाळा समोर आला. प्रत्यक्षात गणेश शिंदे यांना या योजनेचा कोणताही लाभ मिळालेला नाही, गावातील दुसऱ्याच व्यक्तीने त्यांच्या नावावर घरकुल अनुदानाचे पैसे उचलले आहे. गणेश शिंदे यांचे पुतणे समाधान शिंदे यांनी केलेल्या तपासामुळे हा प्रकार प्रकाशात आला.
केंद्र शासनाच्या आवास योजनेअंतर्गत गरजूंना स्वतःचे घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पंचायत समितीमध्ये असाच घोटाळा उघडकीस आला होता आता रावेर पंचायत समिती अंतर्गतही तशीच घटना समोर आली आहे.
गणेश शिंदे यांना २०१७ मध्ये घरकुल मंजूर झाले होते. परंतु त्यांच्या नावावर स्वतःची जागा नसल्यामुळे घरकुल रखडले होते. २०२५ मध्ये ग्रामपंचायतीचा शिपाई त्यांच्या घरी घरकुल पूर्णत्वाची पाटी लावण्यासाठी पोहोचला, तेव्हा त्यांना काहीच माहिती नसल्याचे समोर आले. नंतर समाधान शिंदे यांनी चौकशी केली गणेश शिंदे यांच्या नावावर दुसऱ्याच व्यक्तीने घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले. ज्या व्यक्तीने हा लाभ घेतला, त्याचे नाव गणेश महाजन असल्याचे समजते. महाजन यांनी सांगितले की, ग्रामसेवकांनी त्यांना रीतसर पत्र देऊन हा लाभ घेण्यास सांगितला होता.
या घोटाळ्यात गणेश शिंदे यांच्या नावे घरकुल मंजूर असल्याचे दाखवून, एक लाख वीस हजार रुपयांचा निधी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात वळता करण्यात आला. पंचायत समितीचा निष्काळजीपणा आणि बँक अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे शासकीय अनुदानाची रक्कम अपात्र व्यक्तीच्या हाती गेली.
समाधान शिंदे यांनी रावेर पंचायत समिती आणि ग्रामसेवक यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेरीस त्यांनी हा प्रकार माध्यमांसमोर आणला हा सर्व गैरव्यवहार तत्कालीन गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल आणि डॉ. सानिया नाकाडे यांच्या कार्यकाळात झाल्याचे समाधान शिंदे यांनी सांगितले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गरजूंना हक्काचे घर मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनल करनवाल प्रयत्नशील असताना त्यांच्याच कार्यक्षेत्रात भ्रष्टाचार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सर्व भोंगळ रावेर पंचायत समितीच्या कर्मचारी आणि ग्रामसेवक यांच्यामुळे झाला असल्याचा आरोप होत आहे.