जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील निंबादेवी, मनुदेवी यावल, पाटणादेवी चाळीसगाव येथे अचानक झालेल्या गर्दीमुळे सुरक्षेचे कारण देत जिल्हाधिकार्यांनी जमावबंदीचे आदेश देत जवळपास सर्वच पर्यटन स्थळांवर बंदी लावली आहे. सदरची बंदी लवकरात लवकर हटवून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे जळगाव महानगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, निंबादेवी यावल, मनुदेवी यावल, पाटणादेवी चाळीसगाव येथे झालेल्या गर्दीमुळे तसेच जिवीत हानीचा विचार करता जिल्हाधिकार्यांनी जमावबंदीचा आदेश दिला होता. तो निर्णय त्यावेळी योग्यही होता मात्र आता मनसेकडे ही बंदी उठवावी म्हणून नागरीकांनी निवेदन दिले आहे त्या आधारे आम्ही जिल्हाधिकार्यांना नागरीकांच्या वतीने विनंती करतो आहे की, जिल्ह्यातील नागरीकांना रोजच्या कामाच्या धगधगीतून विकेंडचा आनंद मिळावा म्हणून या पर्यटन स्थळावर लावण्यात आलेली बंदी हटविण्यात यावी. निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यात मोजकेच पर्यटन स्थळे आहे आणि ते सुध्दा बंद असल्याने चोखंदळ पर्यटकांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे सदर पर्यटन स्थळावर प्रशासकीय यंत्रणा लावून योग्य ते उपाययोजना करत लवकरात लवकर सदरचे पर्यटनस्थळे सुरु करण्यास अनुमती द्यावी, असे म्हटले आहे. निवेदनावर महानगराध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हासचिव योगेश पाटील, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, जिल्हा संघटक राजेश निकम, विकास पाथरे, ललीत शर्मा, महेंद्र सपकाळे, रज्जाक सय्यद, राजेंद्र डोंगरे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.