‘Bal Sanskar Kendra’ : अडीच वर्षांपासून जळगावातील स्वामिनारायण मंदिरात होतेय ‘बाल संस्कार केंद्र’

0
23

शहरात उपक्रम ठरतोय एक प्रेरणादायी प्रकल्प

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

धार्मिक संस्कार, नीतिमूल्ये आणि भारतीय परंपरेचे बीज लहान मुलांच्या मनात रोवण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून श्री स्वामिनारायण मंदिरात बाल संस्कार केंद्र यशस्वीरित्या चालवले जात आहे. बालकांमध्ये सद्गुणांची जडणघडण करून त्यांना उत्तम नागरिक आणि संस्कारित व्यक्तिमत्त्व म्हणून घडवणे, असा केंद्राचा उद्देश आहे. केंद्रात ८ ते २५ वयोगटातील मुला–मुलींचा उत्स्फूर्त सहभाग आहे. प्रत्येक रविवारी सकाळी घेण्यात येणाऱ्या वर्गांत श्लोक पठण, भजन, स्तोत्र, नैतिक गोष्टी, नाटिका, प्रश्नोत्तरे, योग व प्रार्थना अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मुलांना श्रद्धा, प्रामाणिकपणा, सेवा, अनुशासन आणि देशप्रेम यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी साधू–संत तसेच सेवाभावी कार्यकर्ते मार्गदर्शन करतात.

सामाजिक जीवनातही मुलांना होतोय लाभ

गेल्या अडीच वर्षांत उपक्रमामुळे शेकडो बालकांमध्ये लक्षणीय बदल दिसून आले आहेत. मुलांची प्रार्थनेत रुची वाढली आहे, आत्मविश्वास वृद्धिंगत झाला आहे आणि पालकांनीही त्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. धार्मिकतेबरोबरच शैक्षणिक व सामाजिक जीवनातही मुलांना त्याचा लाभ होत आहे.

पालकांनी मुलांना मंदिरात आणण्याचे आवाहन

बालक म्हणजे भविष्यातील समाजाचे शिल्पकार अशा तत्त्वज्ञानावर आधारित केंद्र पुढील पिढीला योग्य संस्कार मिळवून देण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ ठरत आहे. मंदिर प्रशासन, साधू–संत आणि सेवाभावी कार्यकर्त्यांच्या समन्वयातून चालणारा असा उपक्रम जळगाव शहरातील एक प्रेरणादायी प्रकल्प ठरला आहे. प्रत्येक रविवारी बाल संस्कार केंद्राचा लाभ घेण्यासाठी पालकांनी मुलांना मंदिरात आणावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here