ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडीत करून बिले वसुली करणे बंद करा

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

राज्य सरकारने चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला असताना तालुक्यात महावितरणच्यावतीने वीज बिले सक्तीने वसुली करण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे तात्काळ वीज बिले वसुली बंद करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना १२ तास दिवसभर वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी रयत सेनेच्यावतीने चाळीसगावचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे.

शासनाच्या सूचनेनुसार दुष्काळाच्या परिस्थितीत चाळीसगाव तालुक्यात कुठलीही वीज बिले वसुली सक्तीने करता येत नाही, असे असताना महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा वीज पुरवठा खंडित करून महावितरण कंपनीकडून मनमानी पद्धतीने वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर वीज भरणा करण्यासाठी त्रास दिला जात आहे. तो तात्काळ थांबवून वीज पुरवठा सुरळीतपणे करून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा. तसेच शिरसगाव येथे शेतकरी दिलीप पाटील हे आमरण उपोषणास बसले होते. त्यांनी शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना १२ तास दिवसभर वीजपुरवठा सुरू केला नाही. तसेच ग्रामीण भागात सध्या कुठल्याही शेतमजुरांना कामे नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचे वीज खंडित केली जात आहे.

शासनाने दिलेल्या दुष्काळाच्या नियमानुसार त्यांचा वीज पुरवठा खंडित करता येत नसताना महावितरण कंपनीने दुष्काळाचे सर्व नियम धाब्यावर बसवून शेतकरी व शेतमजुरांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे राज्य सरकार विरोधात रोष निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीच्यामार्फत ग्रामीण भागात सुरू असलेले वीज बिले वसुली तात्काळ थांबविण्यात येऊन शेतकऱ्यांना व कष्टकरी जनतेला सुरळीतपणे वीज पुरवठा करण्यात यावा. अन्यथा शेतकऱ्यांसह रयत सेना चाळीसगाव कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्यास महावितरण कंपनी व कार्यकारी अभियंता जबाबदार राहणार असल्याचे महावितरणचे सहाय्यक अभियंता यांना रयत सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनाच्या प्रती अधीक्षक अभियंता जळगाव, आमदार चाळीसगाव, पालकमंत्री जळगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर शेतकरी दिलीप पाटील, रयत सेनेचे प्रदेश सहसंघटक ज्ञानेश्‍वर कोल्हे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे, स्वप्निल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष भरत नवले, शहराध्यक्ष छोटू अहिरे, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर सहसंघटक दीपक देशमुख, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, मार्गदर्शक राजेंद्र पाटील, शहर संघटक शिवाजी गवळी, उमेश पवार, मंगेश देठे, प्रा.चंद्रकांत ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here