इंदूर : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील इंदूर-खरगोन दरम्यान आज सकाळी मोठा अपघात झाला. इंदूरहून पुण्याला जाणारी बस सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास धामनोद येथील खलघाटाजवळील पुलावरून कठडे तोडत नर्मदा नदीत पडली. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ५० ते ६० प्रवासी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले, असून अद्याप १५ जणांना वाचवण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. इंदूरपासून 80 किमी अंतरावर हा अपघात झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदोरवरून पुण्याला जाणारी महाराष्ट्र एसटी मंडळाची बस ( एम एच ४० एन ९८४८ ) धार येथून अंमळनेरकडे निघाली होती, अंमळनेरकडे निघालेली ही बस मध्य प्रदेशातील खालघाट येथील दुपदरी पुलावर एका वाहनाला ओव्हरटेक करताना बस चालकाचे नियंत्रण सुटले, असे सांगण्यात येत असून यावेळी चालकाचा तोल गेला आणि बस रेलिंग तोडून नदीत पडली. आग्रा-मुंबई (एबी रोड) महामार्गावर हा अपघात झाला. हा रस्ता इंदूरला महाराष्ट्राला जोडतो. घटनास्थळ इंदूरपासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. संजय सेतू पूल ज्यावरून बस पडली तो धार आणि खरगोन या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेला आहे. पुलाचा अर्धा भाग खलघाट (धार) आणि अर्धा खलटाका (खरगोन) येथे आहे. अपघातानंतर अनेक प्रवासी नदीत वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच खालघाटासह आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले. इंदूर आणि धार येथील एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. हा पूल जुना असल्याचे सांगितले जाते. बस महाराष्ट्र राज्य परिवहनची आहे. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रशासनाला बचाव आणि मदत कार्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान , खरगोनचे जिल्हाधिकारी आणि एसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत.