मुंबई : प्रतिनिधी
देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजुंनी वेगवेगळी रणनीती आखली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून पक्षबांधणीसाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना सध्या ‘सनातन धर्म’ हा चर्चेेच्या केंद्रस्थानी आला आहे.
अलीकडेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी खळबळजनक विधान केले. मलेरिया, डेंग्यू, कोरोना किंवा अन्य रोगांप्रमाणे सनातन धर्माचे उच्चाटन झाले पाहिजे, असे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केले. स्टॅलिन यांच्या विधानानंतर देशभरात विविध राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घेतला. सनातन धर्मावरील टीकेवरून आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीकास्र सोडले आहे.
सनातन धर्मावर होणाऱ्या टीकेबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सनातन धर्म किंवा सनातन संस्कृती ही भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. या देशात कुणीही कुणाच्या धर्मावर बोलले नाही पाहिजे. पण तुम्ही इतर धर्मावर बोलून दाखवा. इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मावर बोललात तर मोठा गोंधळ निर्माण होतो. पण सनातन धर्माविरोधात अशाप्रकारे बोलणे आणि स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानणे, यापेक्षा मोठा मूर्खपणा दुसरा कोणताही नाही. पण त्यांना लोक त्यांची जागा दाखवून देतील. सनातन कधीही संपणार नाही. पण सनातनविरोधी ज्यांचे विचार आहेत, त्यांचे विचार नक्की संपुष्टात येतील.
४