सा.बां.विभाग अन्‌ ठेकेदार विकास कामाच्या नावाखाली वाहनधारकांचा करताहेत ‘छळ’

0
5

साईमत, यावल : प्रतिनिधी

गेल्या ६ महिन्यापासून यावल-भुसावळ रस्त्याचे आणि गटारीचे बांधकाम सुरू आहे. परंतु यावल-भुसावळ रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्ता खराब झाला आहे. त्याची साधी डागडुजी न करता आता सार्वजनिक बांधकाम विभागाने राजोरा फाट्यापासून तर वाघळुद फाट्यापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू केले आहे. रस्त्याचे काम सुरू करताना प्रचंड वाहतुकीचा अंदाज न घेता दोघी बाजूचा रस्ता खोदून टाकल्याने आणि त्यावर खडी पसरविल्याने चार चाकी, दुचाकी वाहनधारकांना आपली वाहने चालविताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार वाहनधारक नागरिकांचा ‘छळ’ करीत आहे. तसेच कामाबाबत ठेकेदाराने काम सुरू करण्याच्या आधी कोणत्या योजनेतून काम सुरू झाले? कोणत्या लोकप्रतिनिधीने मंजूर केले? कोणत्या विभागामार्फत आणि केव्हा काम सुरू झाले? त्याचा काहीही उल्लेख न करता सोयीनुसार काम सुरू केल्याने याबाबत लोकप्रतिनिधी गप्प आणि काही संघटना मात्र चमकोगिरी करून आपला उद्देश सफल करून घेत असल्याचे आणि समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने अधिकारी वर्गांच्या पथ्यावर पडत असल्याचे सर्व स्तरातून चर्चिले जात आहे.

यावल शहराजवळ नगरपालिकेच्या जुन्या नाक्याजवळ वळणावर वापराचे आणि घाण पाणी साचले आहे. रस्त्यात आडवी मोठी चारी पडल्याने येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिकांना दुचाकी, चार चाकी, मोठ मोठे ट्रॉला, अवजड तसेच एसटी बस वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे हे कोणाला अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना दिसत नाही का? फक्त आपली चमकोगिरी करून घेत आहेत का? या ठिकाणचे काम सर्वात आधी ठेकेदार का करत नाही दोन महिन्यांपूर्वी झालेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता आणि बाजूच्या गटारीचे बांधकाम निकृष्ट प्रतीचे झाले आणि त्यावेळेस वाहनधारकांना किती त्रास सहन करावा लागला, हे सर्व ज्ञात असताना आता पुन्हा राजोरा फाटा ते वाघळूद फाटापर्यंत जे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू झाले. त्याठिकाणीही ठेकेदाराने दोघी बाजूने रस्ता खोदून ठेवल्याने आणि त्यावर खडी पसरून ठेवल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे होती आणि अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला दिलेल्या नाहीत का? तसेच कामाबाबत ठेकेदारांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने फलक का लावला नाही..?

राजोरा फाट्यापुढे हतनूर पाटचारीच्या पुढे अंजाळे गावापर्यंत वाहनाचे अर्धे टायर सामावले जाईल एवढे मोठमोठे खड्डे पडलेले आहे. त्या खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी का केली जात नाही? या रस्त्यावर अनेकांच्या मोटरसायकली घसरून हात, पाय फ्रॅक्चर झालेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार या रस्त्यावर अपघातात एखाद्याचा बळी घेण्याची वाट बघत आहेत का? अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहेत. लोकप्रतिनिधींनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना व आदेश देऊन अंजाळे गावाजवळ पडलेल्या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्याबाबत तात्काळ आदेश वजा सूचना कराव्यात. तसेच सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याची व्यवस्था करावी, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here