साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी
येथील जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून तालुक्यात विधवा प्रथेविरुद्ध कार्याचा कालपासून प्रारंभ झाला असून मराठा महासंघप्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक वसुंधरा दशरथ लांडगे व जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तालुक्यातील शिरुड येथील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नाताई भदाणे या दोघींच्या प्रमुख पुढाकाराने या स्तुत्य उपक्रमाला यश आले.
याबाबतची हकीकत अशी की, काल दिनांक 13 जुलै बुधवारी हेडावे ता. अमळनेर येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ. दंगल झाल्टे यांचे निधन झाले. वसुंधरा लांडगे यांना रत्नाताई भदाणे यांचा फोन आला. हेडावे येथे जाऊन त्यांच्या भाऊबंदांशी व त्यांच्या मुलींशी संवाद साधला व प्रबोधन केले.मयत डॉ.झाल्टे यांच्या सुविद्य पत्नी भारतीताई झाल्टे यांनीही विचारांना मान्यता दिली.त्यांचा सौभाग्याचा शृंगार उतरवला नाही. (कुंकू पुसले नाही, बांगड्या फोडल्या नाहीत, मंगळसुत्र काढले नाही व जोडवेही काढले नाहीत.) उलट वसुंधरा लांडगे व रत्ना ताई भदाणे या दोघींनी प्रेताजवळ उभे करुन जयश्रीताईंचे कुंकू ठळक केले.तेव्हा त्यांचा व त्यांच्या मुलींचा ऊर भरून आला. हेडावे गावाचे दोघींनी आभार मानले.गावातील प्रतिष्ठीत लोकांनी दोघींना धन्यवाद दिलेत.जिजाऊ ब्रिगेड च्या माध्यमातून त्यांनी अमळनेर तालुक्यात विधवा प्रथेविरोधी कार्याचा प्रारंभ झाला. हे जिजाऊ ब्रिगेड चे पहिले यश आहे. या सर्व जणी करत असलेल्या कामाची पावती यापुढेही त्यांनी असेच काम करण्याचा निर्धार व्यक्त केला असून तालुक्यातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.