साईमत जळगाव प्रतिनिधी
सुधर्मा सामाजिक संस्था जळगांव परिसरातील गरीब कचरावेचक महिलांसाठी कार्य करते.या महिलांकडे रेशनकार्ड नसल्यामुळे त्यांना रेशन व इतर शासकीय योजनांचा लाभ होत नाही. यासाठी सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे या महिलांना रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विनंती केली आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसार तहसिलदार जळगांव यांचेकडे १ महिन्यापूर्वी उपलब्ध कागदपत्रासह अर्ज केला. यानंतर नायब तहसीलदारांनी संबंधित महिलांचे रेशनकार्डकामी त्यांच्या मोबाईल नंबरची आवश्यकता कळवली तसेच या मोबाईलवर ओटीपी येईल व त्यानंतर संबंधितांना रेशन मिळेल परंतु या महिलांची कमाई तुटपुंजी असल्याने सर्व महिलांकडे मोबाईल नाही. त्यांचे स्वत:चे सीमकार्ड नाही.तरी याबाबत दुसरा काही मार्ग काढता येईल का? अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे. बोगस रेशनकार्डला आळा घालण्यासाठी शासनाने केलेली नियमावली योग्य असली तरी जे अत्यंत दारिद्य्रात आहेत, ज्यांना मोबाईल घेणेही परवडत नाही, त्यांना शासकीय योजनांचा लाभ कसा मिळू शकेल असा यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे.