साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर
गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव-छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच पाचोरा मार्गावरील रस्त्याचेही काम सुरू आहे. त्यामुळे सध्या महामार्गावर धुळीचेच साम्राज्य पसरले आहे. या धुळीचा पादचाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर धुळीचे लोट उठू लागल्याने नागरिकांनी ओरड केली आहे.
पहूरवरून जामनेर, शेंदुर्णी येथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता जात असतात. त्याचप्रमाणे पहूर हे एक मोठे बाजारपेठ आहे. १० ते १२ खेडे गावाला लागून आहे. सकाळपासून मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते. चौफुलीचे गाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांची वर्दळ असते. अशातच पहूर येथे महामार्गावरील पूलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. उन्हाळ्याचे दिवस, कोरडा फफूटा यामुळे प्रवाशी, विद्यार्थी, ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारत येत नाही. मागील पंधरवाड्यात मारुती एस क्रास ही कार नवीन पुलाच्या बांधकाम ठिकाणी उलटली होती. महामार्ग आणि पुलाचे काम गतीने व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.