खा.इम्तियाज जलीलांशी आमची दोस्ती

0
3

संभाजीनगर ः

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.यासाठी भाजपा अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.छत्रपती संभाजीनगरमधून डॉ. भागवत कराड यांना निवडून आणायचे असेल तर ‘एमआयएम’च्या इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवणे आवश्यक आहे, तशी आमची दोस्ती आहे,असे वक्तव्य दानवे यांनी केले आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार इ्‌‍‍म्तियाज जलील हे दानवे यांच्या शेजारीच बसले होते.

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ शिवसेना-भाजपाची युती असताना असताना शिवसेनेच्या ताब्यात होता. शिवसेनेमध्ये आता दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांचा गट भारतीय जनता पार्टीबरोबर महायुतीत आणि राज्यातल्या सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिंदे गटाकडे जाईल असे बोलले जात होते परंतु ही जागा भारतीय जनता पार्टीची असून आपण इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद पूर्वीचे नाव) गेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना तीन लाख 88 हजार 784 मते मिळाली होती तर प्रतीस्पर्धी उमेदवार चंद्रकांत खैरे (शिवसेना) यांना तीन लाख 84 हजार 550 मते मिळाली होती.अवघ्या चार हजार मतांनी खैरे यांचा पराभव झाला होता. भाजपाने या मतदारसंघात शिवसेनेला मदत केली नाही,असा आरोप ठाकरे गटाने सातत्याने केला आहे.त्याचबरोबर एमआयएमला काँग्रेसने नेहमीच भाजपाची बी टीम म्हटले आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसने एमआयएमवर टीका केली आहे.

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटरवर शेअर केला आहे तसेच काँग्रेसने म्हटले आहे की, भाजपाने कशी बी टीम तयार करून ठेवली आहे याची जाहीर कबुलीच रावसाहेबांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here