‘नारी सामर्थ्याची नवी पहाट’ जळगावात उजाडली; स्वसंरक्षण, आत्मविश्वास आणि जिद्दीचा प्रेरणादायी संदेश
साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी
महिलांमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘नारी सामर्थ्याची नवी पहाट’ हा प्रेरणादायी कार्यक्रम जळगावात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शहरातील मोठ्या संख्येने महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला विशेष प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेजर मैत्रेयी दांडेकर तसेच आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या माहेश्वरी सरनोबत उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी स्वसंरक्षणाविषयी महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या या प्रात्यक्षिकांनी उपस्थित महिलांमध्ये उत्साह निर्माण केला आणि त्यांना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मेजर मैत्रेयी दांडेकर यांचा सत्कार डॉ. रेखा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला, तर माहेश्वरी सरनोबत यांचा गौरव सौ. शैलाताई चौधरी यांनी केला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मेजर दांडेकर यांनी महिलांच्या स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत महिलांनी संकटसमयी धैर्य, आत्मविश्वास आणि तत्परता कायम ठेवणे अत्यावश्यक आहे. केवळ इतरांकडून संरक्षणाची अपेक्षा न ठेवता प्रत्येक महिला आणि युवतीने स्वतः सक्षम होण्यासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माहेश्वरी सरनोबत यांनी आयर्नमॅन या जगातील अत्यंत कठीण स्पर्धेचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. या स्पर्धेत ४ किलोमीटर समुद्रात पोहणे, १८० किलोमीटर सायकल चालवणे आणि ७२ किलोमीटर धावणे असे कठीण प्रकार सलग पार करावे लागतात. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी १७ तासांचा कालावधी असतो; मात्र गुरुकृपेच्या बळावर त्यांनी ही स्पर्धा केवळ १५ तासांत पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही नामस्मरण आणि साधनेच्या बळावर हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद करत जीवनातील प्रत्येक कृतीत ईश्वराचे स्मरण आणि श्रद्धा ठेवली तर यश नक्की मिळते, असा प्रेरणादायी संदेश युवतींना दिला.
कार्यक्रमात जळगावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रणरागिणींचाही गौरव करण्यात आला. वयाची मर्यादा न मानता सायकलिंग क्षेत्रात जिद्दीने कामगिरी करणाऱ्या कामिनी धांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी आतापर्यंत सुमारे ५० हजार किलोमीटर सायकलिंग पूर्ण केले आहे. तसेच अवघ्या १५० मिनिटांत ५०० सूर्यनमस्कार, १०० योगासने आणि ७५ योगमुद्रा पूर्ण करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करणाऱ्या हेतल पिपरिया यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष नीतू परदेशी, महिला मोर्चा उपाध्यक्ष नीला चौधरी, जळगावच्या माजी महापौर सीमा भोळे, भाजप नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे तसेच भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेखा वर्मा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात आदिशक्ती श्री दुर्गादेवी आणि जळगावचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना व श्लोक पठणाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. क्षितिजा देशपांडे यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश गायत्री बारी यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या माहितीपर फलक प्रदर्शनालाही उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
