साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरातील तांबापूर परिसर शुक्रवारी संपूर्ण दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने अक्षरशः अंधारात बुडाला. सकाळी सुमारे ९ वाजता गेलेली वीज रात्रीपर्यंतही परत न आल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. प्रचंड उकाडा, पाणीटंचाई आणि दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याने परिसरात तीव्र असंतोष निर्माण झाला.
स्थानिक नागरिकांनी वीज विभागाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही वेळा फोन उचलला गेला नाही, तर काही वेळा “थोड्याच वेळात वीज येईल” असे सांगून वेळकाढूपणा करण्यात आल्याचा नागरिकांचा दावा आहे. या निष्काळजीपणामुळे संतापाचा उद्रेक झाला.
अखेर त्रस्त नागरिकांनी श्यामा फायरजवळ रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन छेडले. अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. त्यामुळे प्रशासन आणि वीज विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनात भाजप कार्यकर्ते वसीम बापू, मिलिंद सोनवणे, मुस्तफा खटीक, इमरान पटेल, जुबेर शेख, गोविंद कांबळे, रिजवान बागवान, शाहरुख बागवान आणि अजमल खान यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
दरम्यान, परिसरातील वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते, यावरच पुढील परिस्थिती अवलंबून आहे.
