मुंबई : प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संंघाने वर्ल्डकप २०२३ मध्ये सलग ९ विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारली.अखेरच्या साखळी लढतीत टीम इंडियाने नेदरलंँड्सवर विजय मिळवला. स्पर्धेत एकही पराभव न झालेला भारत हा एकमेव संघ आहे. सेमीफायनलमध्ये भारताची लढत १५ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. मात्र या लढतीच्या आधी भारताचे टेन्शन वाढणारी बातमी समोर आली आहे.
कर्णधार रोहित शर्माने संपूर्ण स्पर्धेत फक्त ३ वेळा संघात बदल केले होते. पहिली लढत झाल्यानंतर संघात अश्विनच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली होती. त्यानंतर हार्दिक पंड्याच्या दुखापतीनंतर सूर्यकुमार यादव आणि ठाकूरच्या खराब कामगिरीमुळे मोहम्मद शमीला संधी दिली गेली.आता सेमीफायनलमध्ये भारताला कदाचीत संघात पुन्हा एकदा बदल करावा लागू शकतो.
नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीत भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद सिराजला दुखापत झाली. भारताची गोलंदाजी सुरू असताना १५व्या षटकात नेदरलँडच्या मॅक्स ओ डाऊनने कुलदीप यादवच्या चेंडूवर हवेत शॉट खेळला. मॅक्सला चेंडू मैदानाबाहेर पाठवायचा होता पण शॉट निट लागला नाही. सीमारेषेवर मोहम्मद सिराज कॅच घेण्यासाठी आला मात्र कॅच घेताना चेंडू त्याच्या हातातून सुटला आणि गळ्यावर लागला.
या घटनेनंतर सिराजने मैदान सोडले. संघाचे फिजिओने त्याला किती दुखापत झाली हे पाहिले. थोड्या वेळाच्या ब्रेकनंतर सिराज पुन्हा मैदानावर आला आणि त्याने गोलंदाजी देखील केली. सिराजची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतेही अपडेट बीसीसीआयकडून देण्यात आले नाहीत. ज्याने नेदरलँड्सविरुद्ध या घटनेनंतर गोलंदाजी केल्याने ही दुखापत किरकोळ असावी असा अंदाज आहे. पण टीम इंडियाला याआधी अशा प्रकारच्या दुखापतीचा फटका बसला होता. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. सुरुवातीला त्याची दुखापत किरकोळ असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र नंतर हार्दिक संपूर्ण वर्ल्डकपमधून बाहेर झाला.भारताची सेमीफायनलमधील लढत न्यूझीलंडविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.