साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
वाढत असलेल्या महागाईमुळे आधीच संतापाची लाट उसळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसेयांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाना साधला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान केले. मात्र, महागाईमुळे आनंद राहिला नाही, असे खडसे यांनी म्हटले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात दरवर्षीप्रमाणे खडसे कुटुंबीयांनी गणरायाची विधीवत पूजा केली. यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे आणि कुटुंबीयांची उपस्थिती होती. खडसे कुटुंबीयांनी पूजा आणि आरती करून गणरायाची प्रतिष्ठापणा केली.
यावेळी एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांनी गणरायाला साकडे घातले. देशातील जनता सुखी, समाधानी राहू दे. अशी त्यांनी प्रार्थना केली. यावेळी ते म्हणाले, “गणेशोत्सवासाठी लागणारे दही, दूध आणि मोदकही महाग झाले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य हवालदील झाला आहे. महागाईमुळे यंदा गणरायाचे आगमन झाल्यावर होणाऱ्या आनंदावर विरजण पडले आहे.” असा टोला एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.