उष्णतेची लाट ; काळजी घ्या – जिल्हाधिकारी
जळगाव ( प्रतिनिधी)-
जळगाव जिल्ह्यात सध्या तापमानात वाढ झाली आहे. दुपारी तापमान अधिक असल्याने नागरिकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट आहे. नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हात शक्यतोवर घराबाहेर पडणे टाळावे. कामासाठी बाहेर जाणे गरजेचे असेल, तर डोक्यावर टोपी किंवा रुमाल बांधावा. हलक्या रंगाचे आणि सैलसर कपडे परिधान करावे.
त्यांनी सांगितले की, उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता असते. दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी यां पेयांचे सेवन करावे. तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना उन्हात जास्त वेळ राहू देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
उष्माघात झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्या होणे ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाने नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी केल्या असून, त्या सर्वांनी पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.