Dharna protest for pending demands : कृषी सहाय्यकांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष ; प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन

0
17

मागण्या त्वरित पूर्ण करा, आंदोलकांच्या विविध घोषणांनी वेधले लक्ष

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

कृषी विभागातील कृषी सहाय्यकांनी त्यांच्या प्रलंबित आणि विविध मागण्यांसाठी सोमवारी, १९ मे रोजी जिल्हा कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. वेळोवेळी पाठपुरावा करूनही कृषी सहाय्यकांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आपल्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, अन्यथा नाइलाजास्तव कृषी सहाय्यक संघटनेच्यावतीने टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन कृषी सहाय्यकांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी कृषी सहाय्यकांनी आंदोलन पुकारले होते. त्यावेळी शासनाने पंधरा दिवसात मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्यावतीने जिल्हा कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

शासनासमोर मांडल्याहेत प्रमुख मागण्या

आंदोलकांनी आपल्या प्रमुख मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत. त्यात कृषी सेवक कालावधी रद्द करून त्यांना नियमित कृषी सहाय्यक पदावर त्वरित नियुक्त करावे, कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात असतानाही कृषी सहाय्यकांना लॅपटॉप पुरविण्यात यावा, ग्रामस्तरावर काम करताना कृषी मदतनीस आणि वाहतूक भाड्यापोटी कृषी सहाय्यकांना येणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी त्यांना नियमित वाहतूक भत्ता देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

आंदोलनाला शिवसेना उबाठाचा पाठिंबा

कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास कृषीमंत्र्यांच्या गाडीची हवा काढण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगाव ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे. जळगाव येथील कृषी सहाय्यकांच्या धरणे आंदोलनाला शिवसेना उबाठातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here