साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर
टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्यासाठी जलदगतीने उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार प्रशासकीय काळात सावदा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: ठराव मंजूर करून १४ आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरातील गौसियानगर टंचाईग्रस्त भागात नुकतेच कुपनलिकेचे काम पूर्ण केले होते. परंतु विजेच्या डिपीअभावी उन्हाळ्यातही येथील सर्व रहिवाशी कुपनलिकेच्या लाभापासून वंचित राहील, असे वाटत होते. त्यामुळे हा जनहिताचा विषय लवकर मार्गी लावण्यासाठी मंगळवारी, २६ मार्च रोजी अर्जदारांनी थेट आ.चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांना निवेदन देताच क्षणाचाही विलंब न लावता आ.चंद्रकांत पाटील यांनी सावद्याचे मुख्याधिकारी भूषण वर्मा आणि वीज महावितरणचे अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून ही समस्या तातडीने मार्गी लावण्याचे सांगितले. ही कुपनलिका आता सुरु करण्यासाठी लागणारे वीज कनेक्शन निश्चितच लवकर जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आ.चंद्रकांत पाटील यांच्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सावदा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: ठराव मंजूर करून १४ आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरातील गौसियानगर टंचाईग्रस्त भागात नुकतेच कुपनलिकेचे काम पूर्ण केले होते. परंतु विजेच्या डिपीअभावी उन्हाळ्यातही येथील सर्व रहिवाशी कुपनलिकेच्या लाभापासून वंचित राहील, असे वाटत होते. परंतु ही बाब लक्षात येताच लवकरच येथे नवीन विजेची डिपी उभारण्यात यावी, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा समाजसेवक सोहेल खान, शिवसेनेचे शहरप्रमुख सुरज उर्फ बद्री परदेशी, महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्याचे रावेर तालुका उपाध्यक्ष युसूफ शाह, शहराध्यक्ष फरीद शेख, निसार अहमद, सादीक मिस्तरी, शेख कमरोद्दीन, मोईन खान यांनी सावदा वीज महावितरण आणि पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता. त्यानंतर काम लवकर मार्गी लागेल, त्यामुळे उपोषण करु नये, असे लेखी पत्र संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, त्यानंतर याविषयी पालिका व वीज महावितरण विभाग एकमेकांकडे बोट दाखवित असल्याचा प्रकार निदर्शनास आला.
तात्पुरत्या स्वरुपात वीज कनेक्शन जोडून देणार
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर तात्काळ नवीन विजेची डीपी बसविली जाईल. याबाबत आ.चंद्रकांत पाटील यांचाही फोन आला आहे. करदात्यांना पाणीटंचाई भासू नये, म्हणून तात्पुरत्या स्वरुपात वीज महावितरणचे अधिकारी वीज कनेक्शन जोडून देणार आहे. एका आठवड्यात कुपनलिका सुरू करण्यात येईल, असे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी सांगितले.