मुलाचा वाढदिवस साजरा करून गावी परतणाऱ्या बापाचा रेल्वे अपघातात मृत्यू
रावेर ( प्रतिनिधी ) –
भामर्डी (ता. धरणगांव) येथील ३० वर्षीय विवाहित पुरुषाचा मृतदेह दि.२२ रोजी सकाळी रायपुर पाटचारीनजीक रेल्वे रुळावर मिळून आला सावदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भामर्डी येथील कमलेश ज्ञानेश्वर पाटील (वय – ३०) हा विवाहित तरुण दि.१९ रोजी मुंबईहून धरणगाव येण्यासाठी रेल्वेने निघाला होता. त्याच दिवशी त्याने त्याच्या काकाला कॉल करून, झोप लागल्याने गाडी भुसावळहून पुढे निघाली असे कळविले. त्यांनी सावदा येथे उतरून भुसावळला येण्याची माहिती दिली होती. त्यानंतर मात्र त्याचा संपर्क होत नव्हता, नातेवाईक त्याचा शोध घेत असतांना दि. २२ रोजी त्याचा मृतदेह सावदा स्टेशन जवळील रायपुर पाटचारीजवळ मिळून आला.
गॅगमन सलीम शेख यांनी रेल्वे प्रशासनाला माहिती दिली असता, मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.मयत कमलेश पाटील हे त्यांचा १ वर्षाच्या मुलाचा सुरत येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. तेथून परतल्यावर घटना घडली असल्याची माहिती आहे. सावदा पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे.