साईमत/ न्यूज नेटवर्क । फैजपूर ।
पुनर्रचित हवामानावर आधारित ‘फळ पिक विमा योजना आंबिया बहार’ २०२२ मध्ये विमा उतरविलेला शेतकऱ्यांना आजतागायत पिक नुकसानीबाबत पिक विम्याचा लाभ प्रलंबित आहे. शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारींचे तात्काळ निवारण होण्यासाठी केंद्रीय युवक कल्याण तथा क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मागणीनुसार तसेच तत्कालीन कृषीमंत्री यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत केली होती. समितीकडे पिक विम्याचा लाभ नाकारलेल्या ११ हजार २२ शेतकऱ्यांपैकी आठ हजार १९० शेतकऱ्यांनी दाद मागितली होती. समितीने पडताळणी करून लाभासाठी पात्र ठरविलेल्या सहा हजार ६८६ शेतकऱ्यांना पीक विम्याचा प्रलंबित लाभ मिळण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची नुकतीच भेट घेतली.
जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रात केळीचे सर्वाधिक उत्पादन घेत आहे. केळीसाठी आवश्यक सुपिक जमीन जवळजवळ १ लाख हेक्टर येथे उपलब्ध आहे. जिल्ह्यातील केळीची अनेक देशात मागणी असल्याने जळगाव जिल्ह्याचा ‘फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम’ (हॉर्टीकल्चर क्लस्टर) च्या प्रायोगिक टप्प्यात समावेश होण्याबाबत मागणी केली आहे.
