साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी :
पाचोरा येथील कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. “पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?” असे ते म्हणाले आहेत. यावेळी अजित पवार हेसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. पाचोरा हा मतदारसंघ आपल्यालाच जिंकायचा आहे. महाराष्ट्राला अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्वच हवे, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. “बाळासाहेबांच्या पुण्याईवर निवडून आलात आणि त्यांच्या कुटुंबीयांवर तुम्ही टीका करत आहात. २०० कोटी आणले काय आणि ५०० कोटी आणले काय, त्याला काय अर्थ आहे? तुम्ही २०० कोटीच काय ६०० कोटी आणले असतील; पण तत्त्व आणि सत्त्व शिल्लक राहिले नाही. पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?” असे ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे घाणेरडे राजकारण कधी झाले नव्हते. राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. राज्यात खोक्यांची भाषा कधी झाली नव्हती. हे सरकार पाडायचे, ते पाडायचे हेच राज्यात चालू आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. बाळासाहेबांच्या पुण्याईवर निवडून येऊन दुसरीकडे गेल्याचे जनता पाहत आहे. त्यामुळे राज्यातील जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी शिंदेंच्या गटात सामील झालेल्या आमदारांवर लक्ष करत म्हटले.