डॉ. अशोक कोळी यांच्या ‘अशानं आसं व्हतं’ ललित लेख संग्रहाचा अभ्यासक्रमात समावेश

0
2

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ या विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या देशातील प्रमुख नामांकीत विद्यापीठातील अभ्यासक्रमात जामनेर येथील साहित्यिक कवी डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या ‘अशानं आसं व्हतं’ या ललित लेख संग्रहाचा समावेश झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी (एम.ए.) मराठी द्वितीय वर्ष अभ्यासक्रमात जून २०२४ पासून कुमारसाहित्य अभ्यासक्रमांतर्गत ‘अशानं आसं व्हतं’ या ललित लेख संग्रहाची निवड झाली आहे.

जामनेर तालुक्यातील सुनसगाव बु. गावाचे डॉ. अशोक कौतिक कोळी हे रहिवासी आहेत. पूर्व खान्देशातील ह्या छोट्या खेडे गावात त्यांचे बालपण गेले. आपल्या बालपणीच्या आठवणी, शालेय शिक्षण व जडणघडण सोबतच तेथील निसर्ग, शेतीभाती व लोकजीवन – लोकसंस्कृतीचा बोलका पट खास खान्देशी तावडी बोलीत ग्रंथात चितारला आहे. यानिमित्त लेखकाचे बालपण व खान्देशी लोकजीवन व लोकसंस्कृतीची जडणघडण, खान्देशी तावडी बोलीचा लहेजा यांची वाचक, अभ्यासकांना नव्याने ओळख होणार आहे.

या ग्रंथातील बहुतेक लेख साधना साप्ताहिकातून पूर्व प्रकाशित झालेले आहेत. त्यावेळीही वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. पुणे येथीलच नामांकित साधना प्रकाशन संस्थेने ग्रंथरूपाने हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. सुनसगाव बु.या खान्देशातील छोट्याशा खेड्यातील लेखकाचे उपेक्षित भावविश्‍व विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे विद्यापीठात अभ्यासले जाणार आहे हा मोठाच बहुमान आहे. यापूर्वीही ‘अशानं आसं व्हतं’ हा ग्रंथ अमरावती येथील संत गाडगे बाबा विद्यापीठ अभ्यासक्रमात वाङ्मय पारंगत (एम.ए.) मराठीसाठी अभ्यासाला आहे.

कथा, कांदबरी, कवितेचा अभ्यासक्रमात समावेश

सोबतच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या एम.ए.मराठी अभ्यासक्रमात डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या बहुचर्चित, सुप्रसिद्ध ‘पाडा’ कादंबरीचा समावेश आहे. नामांकित अशा मुंबई विद्यापीठ बी.ए. च्या अभ्यासक्रमात ‘चुराडा’ कथेचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, पुणे यांनीही इयत्ता चौथीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकात कोळी यांच्या ‘धूळपेरणी’ कवितेचा समावेश केलेला आहे.

‘पाऊस पिसारा’ पुस्तक प्रकाशित

जामनेर तालुक्यातील गोंडखेल येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळा येथे डॉ. अशोक कोळी हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित आहेत. इयत्ता सहावीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकात त्यांची ‘हिम्मत द्या थोडी’ ही कविता मागील अभ्यासक्रमात होती. त्यांचे ‘पाऊस पिसारा’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यात पावसाची विविध रूपं दर्शविणाऱ्या दर्जेदार गेय कविता असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here