साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नगर पालिकेने पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन पालिका प्रशासनाचे कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी यांना नुकतेच देण्यात आले. यावेळी आपल्या गंभीर मागणीचा नक्कीच विचार करण्यात येईल. ही मागणी वरिष्ठापर्यंत पोहचविण्याची हमी पारधी यांनी दिली.
गेल्या महिन्याभरात शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला आहे. अशातच लहान माळी वाडा शेजारील नवेगावात आनंद पाटील यांचा पाच वर्षीय मुलगा घरच्या ओट्यावर खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्यांनी हाताला चावा घेऊन गंभीर दुखापत केली. घडलेला प्रकार पाहून परिसरातील असंख्य नागरिक भयभीत झाले. वारंवार होत असलेल्या अशा प्रकारामुळे सामान्य जनतेत पालिका प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे.
निवेदनावर भाजपाचे माजी शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, वाल्मीक पाटील, सीताराम मराठे, सुमित मराठे, दिलीप पाटील, आबा पाटील, जितेंद्र पाटील, हेमु चौधरी, पंकज पाटील, समाधान पाटील, समाधान चौधरी, गोकुळ पाटील, राज चौधरी, भुऱ्या धोबी, रिंकु पाटील, विनोद पाटील, भैय्या चौधरी, योगराज महाजन, सोनु महाजन, योगेश मराठे, जितेंद्र महाजन, यशवंत चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.