जळगाव जिल्ह्यातील लोकहितांच्या प्रकल्पांना गती देणार ः मुख्यमंत्री शिंदे

0
1

साईमत, पाचोरा ः प्रतिनिधी

राज्य शासनाने अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे काम केले आहे.जळगाव जिल्ह्यात लोकहितांचे नवीन प्रकल्प सुरू करण्याबरोबरच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यात येईल. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोरा येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात काल दिली.येथील एम.एम.कॉलेज ग्राऊंड येथे ‌‘शासन आपल्या दारी’ या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांंचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याव्ोळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पणही करण्यात आले.

याव्ोळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. याव्ोळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटनमंत्री मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील,खासदार उन्मेष पाटील,आमदार सर्वश्री चिमणराव पाटील,आ.राजूमामा भोळे,आ.जयकुमार रावल,आ.किशोर पाटील,आ.लताताई सोनवणे,आ.चंद्रकांत पाटील,आ.संजय सावकारे,आ.मंगेश चव्हाण आदी याव्ोळी उपस्थित होते.

५० हजार लाभार्थ्यांना लाभ
…शासन आपल्या दारी’ अभियानात पाचोरा – भडगाव तालुक्यातील ५० हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिदे म्हणालेे की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात आतापर्यंतच्या १४ कार्यक्रमातून १ कोटी ६१ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. राज्य शासनाला केंद्र शासनाचे नेहमीच पाठबळ असते.राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दहा हजार कोटींचा करमाफी देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून शासन गतिमान झाले आहे.

८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक उपक्रम, योजना राबविल्या आहेत. शासनाने अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे काम केले असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, महिलांना एसटीत ५० टक्के सवलत,ज्येष्ठांना मोफत प्रवास ,शेतकऱ्यांना नमो सन्मान योजनेत वर्षाला १२ हजार रूपयांची मदत दिली जात आहे. एक रूपयात पीक विमा क्रांतीकारी योजना आहे. शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना दिली आहे. नैसर्गिक आपत्ती पूर्व सूचना देणारे सॅटेलाईट शासन उभारणार आहे. यावर्षी पाऊस कमी पडला ही वस्तुस्थिती आहे मात्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. जी-२० परिषदेत भारताचा ठसा उमटविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शासनाने ३५ जल सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामुळे ८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

अन्‌‍‍ आ.किशोर पाटील जनतेसमोर नतमस्तक
आ.किशोर पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात आ.पाटील हे भावविवश झाले. त्यांनी थेट जनता आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या समोर नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी मतदारसंघासह जिल्ह्यासाठी विविध मागण्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

नारपार -गिरणा नदी जोड प्रकल्प राबविणार ःउपमुख्यमंत्री
नारपार – गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी राज्यसरकार ८ हजार कोटी खर्च करणार आहे. यामुळे ५८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. गिरणा खोऱ्यातील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. निम्न पाडळसे प्रकल्पाच्या कामास निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याव्ोळी सांगितले.नागरिकांचे प्रश्न जागेवर सुटाव्ोत यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविला जात आहे. प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये दुवा साधणारा हा उपक्रम असल्यचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात केळी व कापूस प्रक्रिया उद्योग आणणार
महाराष्ट्रातील सर्वाधिक ठिंबक सिंचन वापर करणारा जळगाव जिल्हा आहे.नैसर्गिक संकटात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जळगाव जिल्हा केळी व कापूस उत्पादनात अग्रेसर आहे.जिल्ह्यात केळी व कापूस प्रक्रिया उद्योग आणण्याचा शासन प्रयत्न करत आहे. जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.केळी पिकांचा समाव्ोश मनरेगा योजनेत समाविष्ट करण्याचा तसेच जळगाव येथे केळी विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन म्हणाले की, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा. त्यांना शासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या लागू नये यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहेत. याव्ोळी आमदार किशोर पाटील यांनी आपल्या मनोगतात पाचोरा-भडगावसह जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प,जनतेशी निगडीत प्रश्नांचा उहापोह करुन यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याचा आग्रह धरला.

या ११ लाभार्थ्यांचा सन्मान
याव्ोळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रातिनिधिक स्वरूपात पाचोरा व भडगाव तालुक्यातील ११ लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली यामध्ये शामकांत शामकांत गणपत जोशी (सातडोंगरी, ता. पाचोरा), गणेश गजानन खोदरे (पाचोरा), रेखा संदीप मोरे,(टोणगाव, ता. भडगाव) सचिन कैलास पाटील,(पाचोरा) साबेरा बी अहमद (भडगाव), दुर्वास जगन्नाथ पाटील (अंजनविहिरी, ता.भडगाव) समर्पित महेश वाघ (गोराडखेडा, ता. पाचोरा), आकाश हिम्मत भिल्ल, (तारखेडा, ता. पाचोरा), भागवत सखाराम बोरसे (आसनखेडा, ता. पाचोरा), पल्लवी मनोहर पाटील (गुढे, ता.भडगाव),प्रविण गंगाराम राठोड (गाळण,ता.पाचोरा) यांचा समाव्ोश होता.या सर्व लाभार्थ्यांचा लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here