छत्रपती शिवाजी महाराजांनी पंचक्रांती देत परकीयांना आव्हान दिले

0
3

साईमत जळगाव प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांनी कृषी क्रांती, अर्थ क्रांती, सामाजिक क्रांती आणि लष्करी व सांस्कृतिक क्रांती अशी पंचक्रांती देवून १७ व्या कालखंडात परकीयांना आव्हान देण्याचे काम केले. त्यातूनच या देशात मन्वंतर घडून आले. असे प्रतिपादन भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्यावतीने ‘छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी निती आणि प्रशासकीय धोरणांची आधुनिक युगातील प्रासंगिकता’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राला शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला. या परिषदेत डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज – राष्ट्रबांधणी करणारे सर्वोत्कृष्ट नेतृत्व या विषयावर बीजभाषण केले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी होते. विशेष निमंत्रीत म्हणून उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात विभागाचे बिग्रेडीयर राहुल दत्त उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, व्यवस्थापन परिषद सदस्य तथा या चर्चासत्राच्या आयोजन समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिष्ठाता डॉ. जगदीश पाटील यांची मंचावर उपस्थिती होती.

डॉ. सहस्त्रबुध्दे आपल्या भाषणात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे स्तिमित करणारे व्यक्तिमत्व आहे. सर्वंकष विचार, चातुर्यपूर्ण रणनिती याद्वारे त्यांनी परकीयांना आव्हान दिले. ब्रिटीशांविरूध्दच्या स्वातंत्र्य लढयाची प्रेरणा शिवाजी महाराजांच्या कार्यात आहे. त्यामुळे शिवरायांच्या कार्यकर्तृत्वावर विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रम तयार करावा असे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला पडीक जमिनीत लागवड करण्याचे आवाहन करून बियाणे-अवजार पुरविले, पाच वर्ष सारा माफी करून करमुक्त व्यवस्था निर्माण केली. त्यातून अर्थक्रांती घडली. शेतकरी समृध्द झाला. अठरापगड जातींना एकत्र करून मावळ्यांची फौज् निर्माण केली. यातून लष्करी क्रांती घडली. यातूनच पुढे आपले आराध्य कसे जपायचे हे सांगून सांस्कृतिक क्रांती दृगोचर केली. नवे युध्दशास्त्र निर्माण करून लढाई ही विजयासाठीच करायची असते ही आकांक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी रूजविली असेही डॉ. सहस्त्रबुध्दे म्हणाले.

ब्रिगेडयर राहुल दत्त म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे कुटनिती, संघटनशक्ती आणि प्रशासन यामध्ये निपुण होते. त्यामुळे त्यांनी युध्दनितीच्या विविध डावांचा अवलंब केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या किल्ल्यांचे बांधकाम पाहिल्यावर ते नौदलाचे पायोनिअर ठरतात. आज भारत ज्या उंचीवर उभा आहे त्याचे श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना आहे. आजही त्यांच्या विचारांची देशाला गरज आहे असे दत्त म्हणाले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी देशाला स्फुर्ती देणारे व्यक्तीमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यांच्या कार्याचा वसा तरूण पिढीने आत्मसात करावा असे आवाहन त्यांनी केले.

राजेंद्र नन्नवरे यांनी प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पैलुंवर दोन देशात चर्चा होणार असे सांगून विद्यापीठाच्या विविध प्रस्तावांसाठी डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. तुषार रायसिंग करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पुरुषोत्तम पाटील व डॉ. विना महाजन यांनी केले. प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ. राम भावसार यांनी आभार मानले.

उद्घटनानंतर डॉ. श्रीकांत परांजपे यांनी छत्रपती शिवाजी महाराज – सर्वोत्कृष्ट सामरिक विचारवंत या विषयावर मांडणी केली. व्य.प. सदस्य डॉ. पवित्रा पाटील अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. परांजपे यांनी राज्य आणि राष्ट्राच्या निर्मितीची संकल्पना जाणून घेण्याचे आवाहन करतांना छत्रपती शिवरायांचे विचार चौकटीत बंदीस्त न करता व्यापक पध्दतीने विचार करण्याचे आवाहन केले. या सत्राचे सूत्रसंचालन सुरेखा पाटील व प्रा. पुरूषोत्तम पाटील यांनी केले. आभार डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी मानले.

तिसऱ्या सत्रात माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज – गुप्तहेर खाते आणि सद्याच्या हेर खात्यासाठी धडे यावर भाष्य केले अध्यक्षस्थानी प्रभारी अधिष्ठाता डॉ. जगदीश पाटील होते. श्री. उमराणीकर यांनी देशाची सुरक्षा लक्षात घेवून आपल्याकडे असलेली माहिती हेर खात्याला देण्याचे आवाहन केले. मानवी गुप्तहेर हे तंत्रज्ञानापेक्षाही प्रभावी असून शिवाजी महाराजांनी त्याकाळात या पध्दतीचा वापर करून साम्राज्याचा विस्तार केला असे मत मांडले. दुपारच्या सत्रात रघुजी राजे आंग्रे, (अध्यक्ष श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे) यांचे व्याख्यान झाले. यावेळी माजी अधिष्ठाता प्रा. प्रमोद पवार, प्रा.पी.डी. जगताप उपस्थित होते. डॉ. कविता धर्माधिकारी यांनी सूत्र संचालन केले. शेवटच्या सत्रात शोध निबंध सादर झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here