मुक्ताईनगर :प्रतिनिधी
वर्षावास बौद्ध बांधवांचा पवित्र असं पर्व असून या पर्वामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्धा आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे सर्वांनी या वर्षावासाच्या कालावधीत वाचन करून अंगीकृत करावे , सोबतच भगवान बुद्धांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन करावे असे आवाहन केंद्रीय शिक्षक प्रा. डॉ. संजीव साळवे यांनी मुक्ताईनगर येथे केले त्यासोबतच त्यांनी बौद्धांच्या उपोसत विषयी मार्गदर्शन केले.
मुक्ताईनगर शहरातील श्री कॉलनी व गोदावरी कॉलनीमध्ये नियोजित बुद्ध विहारा जवळ किशोर बोदडे यांच्या निवासस्थानी भारतीय बौद्ध महासभा तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखेच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे पहिले पुष्प नुकतेच गुंफण्यात आले. सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष शरद बोदडे होते. प्रवचनकार म्हणून विश्वंभर अडकमोल यांनी वर्षावासचे महत्व या विषयावर प्रवचन केले. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षक प्रा.डॉ. संजीव साळवे ,जिल्हा संघटक सुनील आढागळे , केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य पी.डी.सपकाळे, कोषाध्यक्ष आर. वाय. सोनवणे, संघटक प्रवीण सदार, डॉ. दिलीप पानपाटील, प्रा. डॉ. संतोष थोरात, हिशोब तपासणीस व्हि.डी तायडे, बी. एस.घोरपडे, प्रेमदास बोदडे,किशोर बोदडे महिला विभागच्या तालुका उपाध्यक्ष पुष्पा सपकाळे, वंदना गायकवाड आदींसह अनेक उपासक उपासिका उपस्थित होते. त्यांनी या तीन महिन्याच्या कालावधीत आपापल्या घरी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करून अंगीकृत करण्याचा प्रयत्न करा , असा आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तालुका सरचिटणीस चंद्रमणी इंगळे यांनी केले. तर आभार कोषाध्यक्ष आर.वाय.सोनवणे यांनी मानले.