उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल अशोक जैन सन्मानित

0
11

साईमत, प्रतिनिधी, जळगाव

एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीतर्फे दिला जाणारा ‘माझा सन्मान-२०२३’ या पुरस्काराने उद्योग क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांचा गौरव करण्यात आला.

महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या मंडळींचा माझा सन्मान सोहळा मुंबईच्या परळ येथील हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे सोमवारी संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ सिनेअभिनेते जितेंद्र यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माझा सन्मान पुरस्काराचे यंदाचे १५ वे वर्ष आहे. सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना ‘माझा सन्मान’ प्रदान करण्यात येतो. यंदाही महाराष्ट्रासह देशातही ज्यांच्या कार्याची दखल घेतली जाते, अश्ाा व्यक्तिमत्त्वांना ‘माझा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जैन इरिगेशन कंपनीची सहा दशकांपूर्वी ७ हजार रुपयांच्या बीज भांडवलातून सुरुवात झाली. आज जवळपास ७ हजार ९०० कोटींच्या वार्षिक उलाढालीचा आलेख कंपनीने उंचावला आहे. जगभरात ३३ कारखाने, १४५ हून अधिक देशात निर्यात, ११ हजारांच्यावर सहकारी ही कंपनीची बलस्थानं आहेत. यातूनच लाखो शेतकऱ्यांच्या जीवनमानात सर्वांगीण बदल कंपनीने घडवले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात मोलाची भूमिका जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.कंपनी निभावत आहे. या अतुलनीय कामगिरीला अधोरेखित करत अशोक जैन यांना सन्मानित करण्यात आले.

यांना ही केले सन्मानित

यावर्षी अशोक जैन यांच्यासह अमेरिकेतील मिशिगन राज्याचे खासदार श्रीनिवास ठाणेदार, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, ज्येष्ठ लेखक अशोक पत्की, सिनेअभिनेत्री श्रद्धा कपूर, सिने-नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे, कीर्तनकार सत्यपाल महाराज, ज्येष्ठ संशोधक सुरेश वाघे, दत्तात्रय वारे गुरुजो, क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर यांनाही सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार माझ्या शेतकऱ्यांसह सहकाऱ्यांना अर्पण : अशोक जैन

राजस्थान येथून १२८ वर्षांपूर्वी आमचे पूर्वज पाण्याच्या शोधात अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या वाकोद या गावी आले आणि योगा योग म्हणा पाण्यामध्येच काम करत असताना शेती आणि शेतकरी हेच आमचे जीवन राहिले आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू यायला पाहिजे यासाठी राबणे हे आमच्या सर्वांचे कर्तव्य आहे. हा पुरस्कार एका ग्रामीण भागातून आलेल्या उद्योजकाला दिला. त्याबद्दल एबीपी माझाच्या सर्व सहकाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त केले. हा पुरस्कार मी सर्व शेतकरी बांधव व कंपनीतील ११ हजार सहकाऱ्यांना अर्पण करतो. ११हजार सहकाऱ्यांपैकी ९ हजार सहकारी हे आपले मराठी बांधव आहेत. मराठी बांधवांच्या साथीने हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया अशोक जैन यांनी व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here