अमळनेरला संत तुकारामांचा जीवनपट उलगडणारा महानाट्याविष्कार

0
5

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता सादर झालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘जाऊ देवाचिया गावा’ महानाट्याने रसिकगण भावविभोर झाले होते. खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर झालेले महानाट्य पाहण्यासाठी रसिकांनी गर्दीचा उच्चांक मोडला. सभागृह रसिकांच्या उपस्थितीने हाऊसफुल्ल झाले होते. सायंकाळी साडे सात वाजेला सुरू झालेले महानाट्य रात्री सव्वा बारा वाजेपर्यंत चालले.

नाटकाचा समारोप होईपर्यंत सभागृह हाऊसफुल्ल होते. जवळपास चार हजार प्रेक्षकांनी हे नाटक प्रत्यक्ष पाहिले. नाटकाचे थेट प्रसारण ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर या यूट्यूब चॅनलवरून दाखविण्यात येत होते. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी घरी बसून महानाट्याचा लाभ घेतला.

महानाट्यात १५० कलावंतांचा सहभाग

महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन संजय भोसले यांनी केले होते. त्यांनी संत तुकारामाची भूमिकाही साकारली आहे. महानाट्यात १५० कलावंतांनी सहभाग घेतला तर ७० कलावंतांनी आपल्या नृत्यकौशल्यातून डोळ्याचे पारणे फेडले. महानाट्याची निर्मिती डॉ.जर्नादन चितोडे अध्यक्ष वृंदावन चॅरीटेबल ट्रस्ट, पुणे यांनी केली आहे. महानाट्यात बैलगाड्या, पालख्या, घोडे यांच्या सहभागाने महानाट्यात जिवंतपणा आणला होता. महानाट्यास अशोक पत्की यांनी संगीत दिलेले आहे. त्यात १२ गाणी दाखविण्यात आली आहेत. मयूर वैद्य यांनी कोरीओग्राफी तर सतीश काळे यांनी गीते लिहिली आहेत. तसेच सुरेश वाडकर, आनंद भाटे, देवकी पंडित, रवींद्र साठे यांनी गायली आहेत. महानाट्यात आगळ्या वेगळ्या पध्दतीने सादर केलेले आणि त्यागराज खाडीलकरांनी गायिलेले म्मबाजी हे गीत दाद घेऊन गेले.

सभामंडपात गुंजला ‘जय हरी विठ्ठल’चा गजर

महानाट्यात संत तुकाराम ‘जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठला’ चे नामस्मरण करण्याचा प्रसंग दाखविण्यात येत होता. त्या प्रसंगानुसार सभागृहातील रसिक श्रोतेही ‘जय हरी विठ्ठल’च्या नामस्मरणाचा गजर केला. महानाट्याचा समारोप संत तुकाराम यांचा सदेह वैकुंठागमनाने केला आहे. या प्रसंगाने अनेकांच्या डोळ्यात पाणी तराळल्याचे दिसून आले.

आणि असा झाला अमळनेरला प्रयोग

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचा प्रयोग अमळनेरच्या खान्देश शिक्षण मंडळाचे बजरंग अग्रवाल यांनी पुणे येथे पाहिला होता. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांवरील महानाट्याने बजरंग अग्रवाल यांच्या मनावर चांगलेच गारूड केले आणि त्यांनी ठरविले की, महानाट्याचा एक प्रयोग आपल्या अमळनेकरांसाठी करावा. योगायोगाने ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन प्रताप महाविद्यालयात होत असल्याने त्यात हे नाटक सादर करण्याचे त्यांनी निश्‍चित केले. त्यानुसार संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी रविवारी, ४ फेब्रुवारीला ते सादर करण्यात आले. यासाठी खान्देश शिक्षण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here