साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. प्रमुख पक्षांचे नेते आंदोलनस्थळी भेट देत आहेत. त्याचवेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जबद्दल निषेध नोंदविण्यात येत आहे. जिल्हा बंदची हाक देत सरकारचा निषेध करण्यात येत आहे. पाचोरा तालुक्यात तिरडीवर टरबूज ठेवून अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज केला होता. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न रेंगाळला आहे. दरम्यान, पाचोरा येथे अंतरवाली सराटी येथील घटनेचा निषेध म्हणून मराठा समाज बांधवांनी तिरडीवर टरबूज ठेवून सरकारचा जाहीर निषेध करीत अंत्ययात्रा काढण्यात आली. ही अंत्ययात्रा वाजतगाजत काढण्यात आली. यावेळी पोलीसही उपस्थित होते.