महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा निर्णायक पाऊल; शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा आणि बसस्थानकांवर आता वाढणार कडक गस्त
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव शहरात महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा कणा मानले जाणारे ‘दामिनी पथक’ गेल्या काही दिवसांपासून निष्क्रिय झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र या परिस्थितीला आता पूर्णविराम मिळाला असून, पोलीस प्रशासनाने बुधवार, ६ मे पासून हे विशेष पथक पुन्हा नव्या जोमाने सक्रिय करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महिलांवरील वाढते अत्याचार, छेडछाड आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे त्रासदायक प्रकार रोखण्यासाठी हे पथक आता शहरभर सतत गस्त घालणार आहे. विशेष म्हणजे, अरुंद गल्ल्यांपासून ते गर्दीच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी पथकाला एक चारचाकी व दोन दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या उपक्रमात पुढाकार घेत नवनियुक्त महिला पोलीस अंमलदारांशी थेट संवाद साधला. त्यांनी पथकाच्या कामकाजाचे स्वरूप, जबाबदाऱ्या आणि प्रशासनाच्या अपेक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पथक अधिक कार्यक्षम आणि वेगवान करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
दामिनी पथकाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे महिलांचे संरक्षण, घरगुती हिंसाचारावर नियंत्रण आणि छेडछाडीच्या घटनांवर कठोर कारवाई करणे हे आहे. शाळा, महाविद्यालये, बसस्थानके आणि बाजारपेठांसारख्या गर्दीच्या ठिकाणी या पथकाची नियमित उपस्थिती राहणार आहे.
फक्त कारवाईपुरते मर्यादित न राहता, महिलांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करणे आणि त्यांना तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित करणे हेही या पथकाचे महत्त्वाचे कार्य असेल. विद्यार्थिनींना ‘गुड टच-बॅड टच’ याबाबत मार्गदर्शन, तसेच सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचे उपक्रमही राबवले जाणार आहेत.
महिला हेल्पलाईन १०९१ वर आलेल्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देऊन शक्य तितक्या कमी वेळेत घटनास्थळी पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी काहीवेळा साध्या वेशातही गस्त घातली जाणार आहे.
याशिवाय पीडित महिलांना कायदेशीर मदत, वैद्यकीय सहाय्य आणि मानसिक आधार देण्याची जबाबदारीही या पथकाकडे असणार आहे. समुपदेशनाच्या माध्यमातून महिलांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे यावरही विशेष भर दिला जाणार आहे.
या निर्णयामुळे जळगाव शहरात महिलांच्या सुरक्षिततेचे कवच अधिक मजबूत झाले असून, टवाळखोर व गुन्हेगारांमध्ये स्पष्ट धाक निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
