लाचखोरी प्रकरणानंतर नाईक बडतर्फ, निरीक्षकांची तातडीने बदली
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आणि त्यातच उघडकीस आलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणामुळे शनिपेठ पोलीस ठाण्यावर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कठोर भूमिका घेत पोलीस नाईक विनोद अहिरे याला सेवेतून थेट बडतर्फ केले असून, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शनिपेठ परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनांमुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, पोलीस नाईक विनोद अहिरे याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या घटनेमुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर बनले आणि पोलीस दलाची प्रतिमा धुळीस मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त झाली.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत कठोर निर्णय घेतला. विनोद अहिरे याला सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश देण्यात आला, तर ठाण्याच्या प्रभारी अधिकारी कावेरी कमलाकर यांची बदली करण्यात आली. शनिपेठ पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. संवेदनशील प्रकरणांमध्ये होणारी दिरंगाई, शिस्तभंग आणि कार्यपद्धतीतील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त करत वरिष्ठांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
या धडक कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक पारदर्शक आणि जबाबदार भूमिका घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.
