जळगाव मनपात ७ नव्या स्वीकृत नगरसेवकांची एन्ट्री
साईमत जळगाव प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या जळगाव शहर महानगरपालिकेतील ७ स्वीकृत नगरसेवक पदांचा राजकीय पेच अखेर सुटला असून, बुधवारी (दि. १५ एप्रिल) झालेल्या विशेष महासभेत सर्वपक्षीय उमेदवारांची एकमताने निवड करण्यात आली. या निर्णयामुळे महापालिकेतील राजकीय वातावरणात सुरू असलेली अनिश्चितता संपुष्टात आली आहे.
महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष महासभेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवड प्रक्रियेत कोणताही विरोध नोंदवला न जाता सर्व सदस्यांची सहमतीने निवड झाल्याने ही सभा विशेष ठरली.
नवीन नियुक्तीनुसार भारतीय जनता पक्षाकडून डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, प्रदीप रोटे आणि सुभाष शौचे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे. तर शिवसेना (शिंदे गट)कडून हर्षल मावळे आणि नरेंद्र आत्माराम पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तसेच शिवसेना (ठाकरे गट)कडून महानगरप्रमुख शरद तायडे यांची निवड करण्यात आली आहे.
महासभेनंतर महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी नवनियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. निवडीचा निर्णय जाहीर होताच महापालिका इमारतीच्या परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीमुळे परिसर काही काळ उत्साहात दुमदुमून गेला.
या निवडीमुळे जळगाव महापालिकेतील एकूण नगरसेवकांची संख्या आता ८२ वर पोहोचली आहे. नव्या समीकरणानुसार भारतीय जनता पक्षाची ताकद ४६ वरून ५० झाली आहे. शिवसेना (शिंदे गट)ची संख्या २५ वर स्थिरावली असून, शिवसेना (ठाकरे गट)ची संख्या ७ वर पोहोचली आहे. या बदलामुळे महापालिकेतील सत्तासंतुलन अधिक स्पष्ट झाले असून आगामी काळातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेतील या महत्त्वपूर्ण निवडीनंतर आता प्रशासनिक आणि विकासकामांच्या गतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
