साईमत वृत्तसेवा
अमेरिका आणि इराण यांच्यात तब्बल ४० दिवस चाललेल्या भीषण युद्धानंतर अखेर तात्पुरता युद्धविराम लागू झाला असला, तरी या संघर्षाने जगभरात मोठा विध्वंस घडवून आणला आहे. हजारो नागरिकांचा बळी, अब्जावधी डॉलर्सचे नुकसान आणि कोट्यवधी लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या युद्धात नेमके कोणाचे किती नुकसान झाले, याचा आढावा घेतल्यास परिस्थितीची भीषणता स्पष्ट होते.
अमेरिका आणि इस्त्रायल यांनी संयुक्तपणे इराणच्या लष्करी ताकदीला मोठा धक्का दिला. इराणची नौसेना जवळपास पूर्णतः निष्प्रभ झाली, क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमता कमकुवत झाली, तर एअर डिफेन्स प्रणाली आणि अणु कार्यक्रम अनेक वर्षे मागे ढकलले गेले. अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त झाले आणि वरिष्ठ नेतृत्वालाही मोठा फटका बसला. मात्र, या कारवाईसाठी अमेरिकेला तब्बल ८० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक खर्च करावा लागला. अमेरिकेच्या तळांवर आणि दूतावासांवरही हल्ले झाले, तसेच जागतिक पातळीवर तिच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे दिसून आले.
दुसरीकडे, इराणने आपले शासन टिकवण्यात यश मिळवले. नवीन नेतृत्वाखाली कठोर भूमिका अधिक बळकट झाली. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करून इराणने जागतिक तेलपुरवठ्यावर नियंत्रण मिळवत आर्थिक दबाव निर्माण केला. काही दिवसांतच तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आणि इराणने अतिरिक्त उत्पन्नही मिळवले. मात्र, या युद्धात इराणचेही प्रचंड नुकसान झाले. सुमारे ४,००० लोकांचा मृत्यू झाला, रुग्णालये, शाळा, विद्यापीठे आणि तेल-गॅस प्रकल्प उद्ध्वस्त झाले. लाखो लोक बेघर झाले असून अर्थव्यवस्था कोलमडली आहे.
या संघर्षाचा फटका भारतालाही बसला. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्याने भारताच्या ८५ ते ९० टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाला. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती ७० डॉलरवरून थेट ११० ते १२० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या. देशात पेट्रोल-डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्या, तर एलपीजी सिलेंडरचे दर ४,००० रुपयांपर्यंत गेले. अनेक ठिकाणी हॉटेल-रेस्टॉरंट्स बंद पडले, तर सामान्य नागरिकांना पर्यायी इंधनाचा आधार घ्यावा लागला.
एकूणच, या युद्धात कोणाचाही पूर्ण विजय झाला नाही. लष्करी पातळीवर काही प्रमाणात यश मिळाले असले, तरी मानवी आणि आर्थिक नुकसान प्रचंड आहे. सध्या जाहीर झालेला युद्धविराम हा तात्पुरता असल्याने भविष्यातील परिस्थितीबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.
