शेजारी मित्राच्या कटामुळे झालेली हत्या; ४० ते ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा संशय
साईमत / नागपूर
शहराला हादरवून टाकणाऱ्या १४ वर्षीय अथर्व मनोरे अपहरण आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, अथर्व गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता.
गुरुवारी हनुमान जयंतीनिमित्त गिट्टीखदान परिसरात निघालेल्या शोभायात्रेदरम्यान त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. कुटुंबीयांनी अथर्वचा शोध घेतला, मात्र काहीही माहिती मिळाली नव्हती. अखेर परवा दुपारी भरतवाडा परिसरात अथर्वचा मृतदेह सापडला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, अथर्वचा शेजारी आणि मित्र जयराम गोपाल यादव हाच या अपहरणाचा मुख्य सूत्रधार होता. पैशांच्या लालसेत त्याने अथर्वचं अपहरण रचले, आणि त्याला मदत केली होती केतन उर्फ कुणाल रमेश शाहू आणि आयुष मोहन शाहू यांनी.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी अथर्वच्या कुटुंबाकडून तब्बल ४० ते ५० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा डाव आखला होता. अपहरणानंतर अथर्व एका ठिकाणी ठेवण्यात आला. तथापि, अथर्व बेशुद्ध नसल्यामुळे आरोपींनी त्याला मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
गिट्टीखदान पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, आज पहाटेच तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांची सखोल चौकशी सुरू असून, प्रकरणामागील इतर तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे नागपूरात मोठा संताप पसरला असून नागरिकांनी पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. मित्रानेच पैशांसाठी जवळच्या मित्राचा घात केल्याने परिसरात धक्का बसला आहे.
