दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि महाराष्ट्र ATS यंत्रणांनी कट्टर दहशतवादाचा मोठा षडयंत्र उधळला
साईमत /मुंबई
मुंबईतून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने महाराष्ट्र अँटी टेररिझम स्क्वॉड (ATS)च्या मदतीने ही कारवाई करून संभाव्य मोठा दहशतवादी हल्ला टाळल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासानुसार, हे दोघे दिल्लीमध्ये खेळण्याच्या कारमध्ये बॉम्ब लपवून हल्ला करण्याच्या तयारीत होते.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख मोस्साब अहदम उर्फ कलाम कल्याण आणि मोहम्मद हमाद कोल्लारा अशी असून दोघेही मुंबईचे रहिवासी आहेत. अटकीनंतर त्यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात आले आहे. तपासात असे लक्षात आले की, दोघेही कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित झाले होते आणि त्यांचे जैश-ए-मोहम्मद (JeM) तसेच इस्लामिक स्टेट (ISIS) सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची शक्यता आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, आरोपी ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कट्टरतावादी जाळ्यात अडकले होते. “मिशन खिलाफत” आणि “सोल्जर्स ऑफ प्रॉफेट” यांसारख्या नेटवर्कशी त्यांचा संपर्क होता. त्याशिवाय, अबू हुफेजाह नावाच्या संशयित व्यक्तीशी ते संपर्कात होते, जो जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असून ऑनलाइन भरतीसाठी सक्रिय आहे.
अटकेनंतर मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांना इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (IED) तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. खेळण्याच्या कारमध्ये बॉम्ब लपवून दिल्लीमध्ये हल्ला करण्याचा त्यांचा कट असल्याचे तपासातून उघड झाले आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
तपास अधिकारी म्हणतात की, या प्रकरणाचे धागेदोरे देशभर पसरलेल्या मोठ्या नेटवर्कशी जोडलेले असल्याची शक्यता आहे. मुंबईतील काही अल्पवयीन मुलांवरही संशय व्यक्त केला जात असून ते ISIS च्या प्रचारामुळे प्रभावित झाले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.
सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची सखोल चौकशी सुरू असून त्यांच्या नेटवर्कचा विस्तार, निधीचा स्रोत आणि संभाव्य लक्ष्य याबाबत माहिती गोळा केली जात आहे. या कारवाईमुळे एक मोठा दहशतवादी कट उधळण्यात यश आले असून, मात्र संपूर्ण जाळे उघड करणे ही तपास यंत्रणांसमोरची मोठी जबाबदारी राहिली आहे.
