एकलग्न-बोरगाव खुर्दमध्ये २५ लाखांच्या सभामंडपांचे भूमिपूजन जल्लोषात
साईमत /पाळधी, ता.धरणगाव / प्रतिनिधी–
हनुमान जयंती हा केवळ धार्मिक सण नाही, तर श्रद्धा, शक्ती आणि सेवाभाव जागवणारा दिवस आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. मारुती मंदिर हे गावकऱ्यांचे प्रमुख श्रद्धास्थान असून त्याचा विकास म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान होतो, असेही ते म्हणाले.
हनुमान जयंतीच्या पावन व उत्साहपूर्ण वातावरणात एकलग्न (१० लाख रुपये) आणि बोरगाव खुर्द (१५ लाख रुपये) येथे आमदार निधीतून मारुती मंदिर परिसरात सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन जल्लोषात पार पडले. तसेच, बांभोरी बुद्रुक येथील उजाड मारुती मंदिराच्या सुशोभीकरणासाठी १० लाख तर जळगाव तालुक्यातील खिर्डी येथे सभा मंडपासाठी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आले आहेत.
हा कार्यक्रम तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या नियोजनाखाली उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.पी.एस. शाळेचे उपशिक्षक पी.एन. जाधव व युवा सेनेचे भैया मराठे यांनी केले, तर प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य व युवा नेते प्रतापराव पाटील यांनी केले.
कार्यक्रमास बोरगाव खुर्द येथील सरपंच दिनकर पाटील, बोरगाव बुद्रुकचे सरपंच ज्ञानेश्वर मराठे, ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, नंदू पाटील, गोविंदा पाटील, लक्ष्मण पाटील, निंबा कंखरे, गोरख पाटील, किशोर मराठे यांच्यासह एकलग्न येथील उत्तम पाटील, गयभू पाटील, दामोदर पाटील, प्रल्हाद पाटील, अंगणवाडी जिल्हा महिला प्रमुख प्रेमलताताई पाटील, तसेच अनेक स्थानिक नेते, शिक्षक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजनाच्या या कार्यक्रमामुळे दोन्ही गावांमध्ये भक्तिभाव, उत्साह आणि विकासाची नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. पालकमंत्र्यांनी मंदिर परिसर सुशोभित करण्यासाठी व भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
या उत्साहपूर्ण कार्यक्रमामुळे हनुमान जयंतीचा धार्मिक व सामाजिक महत्त्व अधिक खुलून आले असून, गावकऱ्यांमध्ये भक्तिभाव आणि एकजुटीची भावना दृढ झाली आहे.
