साईमत चाळीसगाव प्रतिनिधी
करगाव रस्त्यावर जळगाव आणि धुळे रेल्वे लाईनवरील दोन बोगदे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत होती. वाहतूक बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांपासून व्यापारी वर्गापर्यंत, तसेच वाहनधारकांपर्यंत सर्वसामान्य लोक त्रस्त झाले होते. या परिस्थितीमुळे स्थानिक लोकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवल्या.
या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी १९ मार्च रोजी रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन दोन्ही बोगद्यांची सविस्तर पाहणी केली. पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या बोगद्यांचे नवीन अंडरपास प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सविस्तर अहवाल लवकरच रेल्वे विभागाकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर टेंडर प्रक्रिया पूर्ण करून कामाला गती दिली जाईल. यामुळे भविष्यात करगाव परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असल्याचेही समजते.
सध्या बंद असलेल्या बोगद्यांना तात्काळ सुरू करण्याच्या सूचना आमदार चव्हाण यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या होत्या, त्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच सर्वसामान्य नागरिकांसाठी बोगदे पुन्हा खुले होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
पाहणीवेळी नगराध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष नितीन पाटील, न.पा. शिक्षण सभापती करण पाटील, नगरसेवक अजय वाणी, माजी नगरसेवक भास्कर पाटील, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र राजपूत, उपविभागीय अभियंता के. एन. पाटील, सहायक विभागीय अभियंता ए. के. सिंघल, सिनियर सेक्शन इंजिनिअर एस. सी. शर्मा, भूपेंद्र पाटील, शाखा अभियंते हेमंत चौधरी, अरुण जाधव, आतिश वालतुले आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सध्या या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम चालू आहे, ज्यामुळे मार्ग अरुंद झालेला आहे. अशातच अवजड वाहने ओव्हरटेक करत असतात, आणि या परिस्थितीमुळे अपघाताची शक्यता वाढते. करगाव परिसरात बंद असलेल्या बोगद्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तातडीने कारवाई करून, रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
नवीन अंडरपास प्रकल्पाचे पूर्णत्व झाल्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत होईल, तसेच भविष्यातील अपघातांपासून नागरिकांचे संरक्षणही सुनिश्चित होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
