बाजार समिती शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी?; निलेश नारखेडे यांचा संतप्त सवाल
साईमत/मलकापूर /प्रतिनिधी
शेतकऱ्याची तूर बाजारात उतरते तेव्हा दर उतरतो; व्यापाऱ्यांचा नफा वाढतो आणि बाजार समिती प्रशासन मात्र गप्प बसते, हे नेमके कुणाच्या हिताचे राज्य आहे? असा संतप्त सवाल उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला.
तुरीच्या खरेदीत शेतकऱ्यांची उघड लूट सुरू असताना बाजार समिती प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. शासनाकडून जाहीर करण्यात आलेला हमीभाव प्रत्यक्षात केवळ कागदावरच राहिला असून, मलकापूर बाजार समितीत तूर व्यापाऱ्यांच्या मनमानी दराने खरेदी केली जात असल्याचे वास्तव त्यांनी अधोरेखित केले.
हमीभावाने खरेदी सुनिश्चित करणे ही बाजार समितीची जबाबदारी असताना प्रशासन मूकदर्शकाची भूमिका बजावत असल्यामुळे व्यापाऱ्यांचे फावले असून शेतकरी मात्र आर्थिक कोंडीत सापडला आहे. शेतकऱ्याच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा यासाठी स्थापन झालेल्याच व्यवस्थेत शेतकऱ्यांची लूट होत असेल तर ही व्यवस्था नेमकी कोणासाठी काम करते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापेक्षाही अधिक संतापजनक बाब म्हणजे बाजार समितीतील अमानवी अवस्था. शेतकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, बसण्यासाठी साधी व्यवस्था नाही तसेच स्वच्छ शौचालयांचाही अभाव आहे. दिवसभर उन्हात रांगेत उभा राहणाऱ्या शेतकऱ्याला माणूस म्हणून वागणूक देण्याचीही तसदी प्रशासन घेत नसल्याची तीव्र टीका नारखेडे यांनी केली. ही केवळ निष्काळजीपणा नसून शेतकऱ्यांप्रती असलेली असंवेदनशील मानसिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व मुद्द्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. मात्र, तात्काळ हमीभावाने तूर खरेदी सुरू न झाल्यास आणि शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून न दिल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. गरज पडल्यास बाजार समितीवर धडक मोर्चा, रास्ता रोकोसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळू ठाकरे, गोपाल रायपूरे, तालुकाध्यक्ष गोपाल सातव, विश्वास होले, प्रमोद पाटील, सुरेश चौधरी, विनोद सरोदे, सीताराम ढोन, भगवान संबारे, संदीप खाचणे, कुंदन पाटील, सचिन देशमुख, अनिल घाटे, राहुल इंगळे, प्रतिक होले, सारंग खर्चे, दीपक पाटील यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
