वीज महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे रयत सेनेची मागणी
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
वीज ग्राहकांकडे वीज मिटर सुस्थितीत असताना वीज महावितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांकडे नवीन स्मार्ट मिटर बसविले जात आहेत. ते जास्त गतीने फिरतात. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त दरमहा १ ते ३ हजार रुपये भूर्दंड बसत आहे. त्यामुळे ते बसविणे वीज महावितरण कंपनीच्यावतीने बंद करावे, अशी मागणी रयत सेनेने सहा. अभियंता सुनील कांदे यांच्याकडे सोमवारी, १ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास रयत सेनेच्यावतीने मोठे जन आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रत चाळीसगावचे आमदार, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत.
स्मार्ट मीटरमध्ये जास्त रिडिंग येईल, अशी रचना असून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रखर स्मार्ट मीटरला विरोध होत आहे गरजू, दुर्बल घटकांना अशी जास्तीची बिले आल्यावर वीज ग्राहकांवर भुर्दंड बसणार आहे. ते परवडणारे आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटरला विरोध सुरु केला आहे. जनतेचा विचार करून महावितरण कंपनीने जुने मीटर खराब झाल्यानंतर स्मार्ट मीटर बसवू नये. तसेच स्मार्ट मीटर बसवणे बंद न केल्यास हिरापूर रोड येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता यांची आरती उतरवून कंपनी कार्यालयावर रयत सेनेच्यावतीने जन आंदोलन उभारले जाईल.याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला वीज महावितरण कंपनी, चाळीसगावचे कार्यकारी अभियंता घुमरे जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुकाध्यक्ष संजय हिरेकर, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, विलास मराठे, शहराध्यक्ष प्रदीप मराठे, शहर संघटक शिवाजी गवळी, शहर कार्याध्यक्ष प्रकाश गवळी, संघटक दीपक देशमुख, हर्षल ठाकूर, भूषण पाटील, विकास परदेशी, समाधान राठोड, कुणाल पाटील, अभिजीत शिंदे, मुरलीधर तांबे, ऋषिकेश जाधव यांच्यासह रयत सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.