जिल्हा वकील संघातर्फे आयोजित सोहळ्यात ॲड. अमोल सावंत यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
वकिलांसाठी संरक्षण कायदा आणि कल्याणकारी योजनांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे चेअरमन ॲड. अमोल सावंत यांनी केले. जिल्हा वकील संघातर्फे जिल्हा न्यायालयाच्या बाररूमच्या सभागृहात आयोजित त्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी वकिलांशी संवाद साधताना शासनाने वकील हिताचे निर्णय घ्यावे, यासाठी बार कौन्सिल नेहमी प्रयत्नशील आहे. सेवानिवृत्ती वेतन, व्हेरिफिकेशन, मानधन, नवीन इमारतीचा प्रश्न, पार्किंगची समस्या आदी विविध विषयांवर सविस्तरपणे माहिती दिली. बार कौन्सिलची कार्यपद्धती, कामकाज, आर्थिक स्थिती, ऑडिट, सदस्य यादी याविषयी विवेचन केले.
विधी महाविद्यालयांची वाढणारी संख्या बघता हे नवीन वकील तयार करणारे जणू कारखानेच झाले आहे, अशी खंत ॲड.सावंत यांनी व्यक्त केली. तसेच नवीन वकिलांनी केवळ हा बिन भांडवली व्यवसाय म्हणून याकडे न बघता काळाची आव्हाने ओळखून पारंपारिक वकिली बरोबर नवीन पद्धतीने व तंत्रज्ञानाचा वापर करीत आपले ज्ञान अद्ययावत केले पाहिजे, असे आवाहनही केले. बार कौन्सिलचे चेअरमनपद हा काटेरी मुकुट आहे. कारण सन्मानाबरोबर वकिलांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी असते, असे सांगून त्यांनी आपल्या जिल्ह्यातील सत्कार हा माझ्या दृष्टीने भावनिक आहे, असे शेवटी सांगितले.
कार्यक्रमास अनेक ज्येष्ठ वकिल, कोषाध्यक्ष ॲड. प्रवीण चित्ते, सहसचिव ॲड.लीना मस्के आदी मान्यवरांसह २०० वकिलांची उपस्थिती होती. विविध संस्था, व्यक्ती व विधी महाविद्यालयातर्फे ॲड. सावंत यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपाध्यक्ष ॲड. स्मिता झाल्टे यांनी करून दिला. प्रास्ताविक अध्यक्ष ॲड. सागर चित्रे, सूत्रसंचालन सचिव ॲड. वीरेंद्र पाटील यांनी केले.
