सर्व तक्रारींचा शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्परतेने केला निपटारा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गेल्या २७ मे रोजी एरंडोल येथे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या शिक्षक संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून झालेल्या शिक्षक तक्रार निवारण सभेतील उर्वरित प्रकरणांची आणि नव्याने आलेल्या प्रकरणांची २४ जून रोजी जि.प.च्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात सभा घेण्यात आली. सभेत शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘नो पेंडिंग सिस्टीम’ ची ग्वाही दिली. शिष्टमंडळाचे नेतृत्व समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल यांनी केले. सभेला उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, उपशिक्षणाधिकारी रागिनी चव्हाण, अधीक्षक प्रतिभा सुर्वे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी विविध विभागातील संबंधित अधिकारी यांच्याशी विविध प्रकरणांच्या अनुषंगाने स्वतः संवाद साधत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले. जिल्ह्याभरातील माध्यमिक शिक्षकांच्या वेतनासंदर्भात दर महिन्याला उशिरा होत असलेल्या वेतनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात येऊन वेतन पथकाच्या अधीक्षकांना पगार बिल कार्यालयात आणण्याबाबत लेखी पत्र दिल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झालेल्या संस्थांमध्ये चौकशी अधिकारी नेमून चौकशीचा कार्यक्रम निश्चित केला. पात्र शिक्षकांचे वेतन डावलून संस्थांमार्फत काढली जाणारी वेतन देयके त्वरित थांबविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन प्रस्ताव न पाठविलेल्या शाळासंदर्भात कडक कारवाई करण्याचे आश्वासनही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.
प्रलंबित देयकेही लवकरच निकाली काढण्याचे दिले आश्वासन
पात्र शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव हेतूपुरस्कररित्या संस्थांमार्फत डावलले जात आहेत. अशा प्रकरणी ठोस कारवाईचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांचे पगार उशिरा होत असल्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने प्रयत्न करून शिक्षकांचे पगार वेळेवर करण्याचे आश्वासन दिले. तसेच भविष्य निर्वाह निधी व इतर प्रलंबित देयके लवकरच निकाली काढणार असल्याचे आश्वासनही त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
शिक्षणाधिकाऱ्यांचे वेधून घेतले लक्ष
संस्थांमध्ये काम करीत असताना शिक्षकांना सामोरे जावे लागलेल्या अनेक समस्यांकडे भारत शिरसाठ, डॉ. मिलिंद बागुल यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रणजित सोनवणे, महानगराध्यक्ष टी.बी. पांढरे, सचिव वर्षा अहिरराव, तालुकाध्यक्ष प्रज्ञा तायडे, सहसचिव प्रकाश तामस्वरे, चेतन नवगिरे यांच्यासह अनेक तक्रारदार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.