घरगुती उपाय टाळा, लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा
साईमत/धुळे/प्रतिनिधी :
नागीण ही एक विषाणूजन्य त्वचेची समस्या आहे. ताप येणे तसेच डोकेदुखी ही काही सामान्य लक्षणे आहेत. तसेच थकवा जाणवणे आणि पोटदुखी ही सुरुवातीची काही लक्षणे आहेत. काही दिवसांनी काही गंभीर लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे अशा रुग्णांनी घरगुती उपचार करू नये, अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन धुळे जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ त्वचा रोगतज्ज्ञ डॉ. अभिषेक पाटील यांनी केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, नागीण आजार वेरिसेला झोस्टर या कांजण्यांच्या विषाणूमुळे होतो. त्यामध्ये शरीरावर पाण्याचे बारीक पुरळ किंवा फोड येतात. ज्यामुळे शरीराला खाज सुटते. जळजळ होते. तसेच वेदना आणि ताप येतो. हा एक संसर्गजन्य आजार असल्याने यात वेळीच काळजी घेणे गरजेचे असते. मात्र, बरेचसे नागरिक सुरुवातीला विविध प्रकारचे घरगुती उपचार करतात किंवा उपचाराकडे दुर्लक्ष करतात. वेळेवर डॉक्टरांना दाखवित नाही. त्यामुळे हा आजार अधिक बळावत असतो. त्यामुळे रुग्णांनी तातडीने उपचार घेतल्यावर आजारावर नियंत्रण मिळविता येत असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.
बरे होण्यासाठी किती कालावधी लागतो ?
नागीणची लक्षणे दिसू लागल्यापासून साधारण २ ते ३ आठवडे आजारातून बरे होण्यासाठी लागू शकतात. या कालावधीत डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधोपचार केल्याने रुग्णांना लवकर आराम मिळण्यास मदत होत असते. आजारपणात रुग्णांनी स्वच्छता पाळणे गरजेचे असते.
कोणता आहार घ्यावा
नागिणीच्या समस्येतून लवकर बरे व्हायचे असेल तर आहारात बदल करणे गरजेचे आहे. नागिणीची वाढ म्हणजेच फोड वाढणे थांबविण्यासाठी आहारात व्हिटॅमिन बी, ई, ए आणि सी यांचा समावेश करणे गरजेचे आहे. हिरव्या पालेभाज्या, फळ यांचा आहारात समावेश करावा, तिखट किंवा तेलकट पदार्थाचे सेवन पूर्णपणे टाळावे.
उपचार कसा कराल ?
नागिणीचा त्रास सुरू होताच वेळीच डॉक्टरकडे गेल्यास त्रास आणि वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. या आजारावर एसाइक्लोविर हे ॲन्टी व्हायरस मेडिसिन दिले जाते. याशिवाय फॅमसीक्लोविर आणि व्हॅलासायक्लोविर ही औषधेही रुग्णांना दिली जातात. एखाद्या रुग्णाला अधिक वेदना होत असतील तर त्याला जोस्टावॅक्स नावाचे व्हॅक्सिन दिले जाते.
नागीण आजार आहे तरी काय?
नागीण आजार वेरिसेला झोस्टर या कांजण्यांच्या विषाणूमुळे होतो. यामध्ये शरीरावर पाण्याचे बारीक पुरळ येतात. ज्यामुळे शरीराला खाज सुटते. जळजळ होते तसेच वेदना आणि ताप येतो.
आजाराची लक्षणे कोणती?
थंडी भरून येणे, ताप येणे, डोकेदुखी ही काही सामान्य लक्षणे आहेत. तसेच शरीरावर एका विशिष्ट भागात, विशेषतः एका बाजूला, लहान, पाण्याने भरलेले फोड येतात. तसेच पुरळ येण्यापूर्वी किंवा आल्यावर खाज, मुंग्या येणे किंवा जळजळ होऊ शकते.
नागीण आजाराची लक्षणे दिसल्यावर रुग्णांनी ताबडतोब डॉक्टरांना दाखवावे. घरगुती उपचार करु नये. जर वेळेवर डॉक्टरांना दाखविले तर उपचारामुळे रुग्ण लवकर बरा होतो. तसेच विविध लक्षणे आजाराची असतात.
-डॉ. अभिषेक पाटील, वरिष्ठ त्वचारोग तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, धुळे.