शिंदखेड्यात ‘सफर अंतराळाची’ आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन
साईमत/शिंदखेडा/प्रतिनिधी :
विविध प्रकारची सूर्यग्रहणे, अमावास्या, पौर्णिमा, धुमकेतू अशा निसर्गातील खगोलीय घटना आहेत. त्यात काहीही शुभ-अशुभ नाही. त्याबद्दल अंधश्रद्धा बाळगल्याने आपल्या लहानशा आयुष्यात कधीतरी घडणाऱ्या विलक्षण, सुंदर खगोलीय आविष्काराचा आनंद घेण्यापासून आपण वंचित राहतो. त्याचा मनसोक्त आनंद घेतला पाहिजे, असे प्रतिपादन तन्वी सुषमा परेश यांनी केले. येथील क्रांतीज्योती सखी मंचतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर सभागृहात ‘सफर अंतराळाची’ हा अवकाशाचे दर्शन घडविणारा अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी क्रांतीज्योती सखी मंचच्या अध्यक्षा सुषमा शाह होत्या.
येथील मिराबाई गर्ल्स हायस्कूलची तन्वी ही विद्यार्थिनी आहे. ती मुंबई येथील डी. जी. रुपारेल महाविद्यालयातून नुकतीच भौतिकशास्त्रात पदवीधर झाली आहे. खगोल भौतिकशास्त्रातील आवडीमुळेच जाणीवपूर्वक तिची विद्याशाखा करियर म्हणून निवडली आहे. तिने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सुमारे दोन तास श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विश्वाचा अफाट पसारा, आपली सूर्यमाला, तिची निर्मिती, आपल्या सूर्यमालेतील विविध ग्रह, त्यांची वैशिष्ट्ये, आकाशगंगा, कृष्णविवरे, ग्रहणे, कालमापन, अमावास्या पौर्णिमा हा सावल्यांचा खेळपासून ते खगोलशास्त्राच्या विकासातील खगोलशास्त्रज्ञांचे योगदान व फलज्योतिषाचा फोलपणा अशा सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला. तिने आपला पहिला वाहिला कार्यक्रम दिवंगत खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना समर्पित केला. यावेळी तन्वीने प्रेक्षकांच्या शंकांचे निरसन केले.
महिलांमधून लकी ड्रॉ काढून दिली भेटवस्तू
यावेळी उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढून भेटवस्तू देण्यात आली. हा ड्रॉ भाग्यश्री नाईक यांनी केला. यशस्वीतेसाठी सखी मंचच्या कार्यकारिणी आणि पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पाहुण्यांचा परिचय तृप्ती गिरासे, सूत्रसंचालन वैशाली शिंदे तर प्रास्ताविक तथा आभार कल्पना परदेशी यांनी मानले.