नवीन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी आर.बी.चौरे यांचे प्रतिपादन
साईमत/नवापूर/प्रतिनिधी :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिलीचा अभ्यासक्रम बदलला आहे.अभ्याक्रमातील बदल, त्यातील अध्ययन आणि अध्यापन पद्धती आणि इतर विषयांची माहिती देण्यासाठी नवापूर तालुक्यातील ३०० शाळेतील पहिलीच्या वर्गावरील शिक्षकांचे ९ ते १४ जून या कालावधीत प्रशिक्षण दिले आहे. विद्यार्थ्यांना आनंददायी, मनोरंजनात्मक शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करून शैक्षणिक वातावरणाने शैक्षणिक वर्षाची सुरुवात करावी, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी आर.बी.चौरे यांनी व्यक्त केली. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची (एनईपी) अंमलबजावणी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात यंदापासून होत आहे. जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम असेल. हे शिक्षण धोरण चार टप्प्यात विविध वर्गांना लागू होईल. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेचा परिसर स्वच्छ करून घेणे. तसेच पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरे करणे, अशा सूचना प्रशिक्षणावेळी गटशिक्षणाधिकारी आर.बी.चौरे यांनी दिल्या.
नंदुरबार जिल्ह्यात तालुकानिहाय अशा हजारो शिक्षकांचे प्रशिक्षण होत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरणाकडून आयोजित प्रशिक्षणामुळे पहिलीच्या मुलांना नवीन अभ्यासक्रमानुसार शिकविण्याच्या पद्धती, त्यातील सीबीएसई पॅटर्ननुसार टप्पे आदींचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रम शाळा खासगी शाळा, अनुदानित आश्रमशाळेतील ३०० शिक्षकांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण ९ ते ११ जून २०२५ दरम्यान १४५ शिक्षकांना देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण १२ ते १४ जून दरम्यान १४८ शिक्षकांना देण्यात येत आहे. त्यासाठी नवापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर.बी.चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक मराठी व गुजराती हायस्कूलमध्ये देण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी समन्वय तथा शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते, केंद्र प्रमुख भगवान सोनवणे, शैलेश राणा, प्रशिक्षण देणारे सुलभक म्हणून दिलीप गावित, केशव वळवी, हरिश्चंद्र नाईक, निदेश वळवी यांनी काम पाहिले. प्रशिक्षणात गट कार्य करण्यासाठी विविध शैक्षणिक साहित्याचा वापर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुकास्तरीय प्रशिक्षणात गट कार्यासाठी लागणाऱ्या विविध शैक्षणिक साहित्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
यंदा पहिलीला नवीन पुस्तक नवीन शैक्षणिक धोरण
यंदा पहिलीला नवीन पुस्तके अशा नव्या धोरणानुसार असतील. २०२६-२७ म्हणजेच पुढल्या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांच्या अभ्यासक्रमात बदल होईल. त्यानंतर इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी अशा चार वर्षांचा अभ्यासक्रम तिसऱ्या टप्प्यात म्हणजे २०२७-२८ मध्ये बदलणार आहेत. अंतिम टप्प्यात २०२८-२९ मध्ये आठवी, दहावी आणि बारावी इयत्तांची पुस्तके बदलणार आहेत.