Nashik Municipal Education Department : नाशिक मनपात शिक्षण विभागाच्या सर्व योजनांचा शिक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा

0
10

आगामी शैक्षणिक वर्षासाठी विविध उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणीबाबत ठरविली दिशा

साईमत/नाशिक/प्रतिनिधी :

येथील महानगरपालिकेच्या मनपाच्या स्थायी सभागृहात शिक्षण विभागाची आढावा बैठक शुक्रवारी, १३ जून रोजी पार पडली. अध्यक्षस्थानी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे होते. बैठकीला शिक्षक आमदार किशोर दराडे, अजय बोरस्ते, विजय करंजकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, प्रदीप चौधरी (शहर), नाशिक शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ.मिता चौधरी यांनी स्लाईड शोद्वारे मनपा शिक्षण विभागाच्या सर्व योजनांचा आढावा घेतला. तसेच आगामी शैक्षणिक वर्षासाठी विविध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीबाबत दिशा बैठकीत ठरविण्यात आली.

नाशिक महानगरपालिकेच्या सद्यस्थितीत १०० शाळांमधून ३२ हजार ३९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशासनाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सीएम श्री शाळा आणि पीएम श्री शाळा यात अनुक्रमे दहा आणि दोन शाळा प्रस्तावित करणार असल्याचे समजते. मनपाच्या सर्व शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. १०० पैकी जवळपास ७७ शाळांमध्ये पक्क्या भितींचे कंपाउंड आहे तर उर्वरित शाळांमध्ये काही ठिकाणी काम सुरु आहे. सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहे. त्यात पाण्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध आहे. मागील आठवड्यात राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेचे दोन प्रस्ताव योजना कार्यालयाला सादर केले आहेत.

इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये मनपाच्या शाळांमधून सात विद्यार्थी तर खासगी शाळांमधून १३३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. आधार कार्ड अद्ययावत करण्याचे काम यु-डायस प्रणालीत जवळपास ९४.४८ टक्के इतके पूर्ण झालेले आहे. गेल्यावर्षी मनपाच्या सर्व शाळांमध्ये आरोग्य तपासणी झाली आहे. तपासणीत काही विद्यार्थ्यांना हर्निया, हृदयरोग, दातांच्या समस्या, त्वचारोग यासारख्या उपचारांची गरज होती. त्यासाठी त्यांना मोफत उपचार केले आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांवर मुंबईच्या इस्पितळात मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. ५ मार्च २०२५ च्या शासनिर्णयानुसार ३० जून रोजी मनपाच्या सर्व शाळा निपुण घोषित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.गेल्यावर्षी पवित्र पोर्टलद्वारे हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या रिक्त पदांवर भरती केली आहे. १६ जून शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व पदाधिकारी, अधिकारी यांचे भेटीचे नियोजन केले आहे.

यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, आमदार, खासदार हे स्वतः शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. त्याप्रमाणे नाशिक महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे नियोजन करण्यास मंत्र्यांनी आदेशित केले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तके यांचे वाटप होणे आवश्यक आहे, असे सांगितले. महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्प हा नाशिकमधील अतिशय मोठा प्रकल्प आहे. त्याठिकाणी त्यात विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित कराव्यात. तसेच नाशिक महानगरपालिकेचे आयडॉल शिक्षक आहेत. त्यांचे सर्व शिक्षकांच्या बरोबर बैठक आयोजित करून घ्यावी, इतर शिक्षकही त्यांचे अनुकरण करतील.

पटसंख्येवरून मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी

महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त शाळांना वारंवार भेट देऊन गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी मंत्र्यांनी गेल्या पाच वर्षाच्या शाळा विद्यार्थी संख्या आणि शिक्षक संख्या यांचा आढावा घेतला. शिक्षण विभागातील घसरलेली पटसंख्यावरून मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यासाठी शासकीय योजनांची माहिती पालकांपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी प्रयत्न करा, शाळांना काही सुविधांची गरज असेल तर त्यासाठी शासकीय योजना, सीएसआर फंड, माजी विद्यार्थ्यांची मदत घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

मंत्र्यांनी दिली आदर्श शाळांची उदाहरणे

आढावा बैठकीत कोल्हापूर महानगरपालिका, धाराशिव जिल्हा परिषद व वाबळेवाडीची शाळा यासारख्या आदर्श शाळांची उदाहरणे त्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सहली नाविन्यपूर्ण ठिकाणी जसे शेती, उद्योगधंदे, फाळके स्मारक यासारख्या ठिकाणी आयोजित करण्याचे निर्देश दिले. राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे ३६५ दिवसांचे कॅलेंडर आगामी काळात तयार होणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here