शहरातील खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचा मनपाला दिला इशारा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी, २७ मे रोजी ‘खड्डे भरो’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड.जमिल देशपांडे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जनहितचे संदीप मांडोळे, प्रकाश जोशी, साजन पाटील, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, विकास पाथरे, उमेश आठरे, विशाल जाधव, विनोद पाटील यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
महानगरपालिका जिथे काम करू शकत नाही तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जनतेला सोबत घेऊन श्रमदान करून स्वखर्चाने मुरूम आणून खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे महानगरपालिका, माजी नगरसेवक, आमदार, खासदार यांचे कोणतेही जनतेकडे लक्ष नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आक्रमतेचा पवित्रा हाती घेतला आहे. जळगाव शहरामध्ये ज्या-ज्या ठिकाणी खड्डे दिसतील त्या-त्या ठिकाणी आता झाडे लावण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार असल्याचा इशारा महानगरपालिकेला मनसेने दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कॉलनीचा सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे केवळ गैरसोयच नाही तर अपघातांचा धोकाही वाढला आहे. याच मुद्द्यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने श्रमदान करुन ‘खड्डे भरो’ आंदोलन केले.
मनसेने श्रमदान करुन बुजविले खड्डे
जळगाव जिल्ह्यासह शहरात आता भाजपाचे खासदार, आमदार तसेच जळगाव शहराला लाभलेले तीन तीन मंत्री असूनही जळगाव शहराचा विकास होत नाही. त्यामुळे विकासाच्या केवळ गप्पा मारण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधींकडून सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना विकास कसा करावा त्याचे उदाहरण आंदोलनाच्यामार्फत मंत्री महोदयांना दिले आहे. आंदोलनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी श्रमदान करुन खड्डे बुजविण्याचे काम केले. त्यांचे सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांनी कौतुक करुन आभार व्यक्त केले आहे.