Mini Ministry : मिनी मंत्रालय : तालुकास्तरावर होणार तक्रार निवारण दिन

0
7

‘प्रशासन आपल्या दारी’, जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या संबंधित कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध शाखा कार्यालयांमध्ये नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्ष साचलेल्या तक्रारी आणि त्यांना वारंवार माराव्या लागणाऱ्या फेऱ्या आता थांबणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून दर महिन्यातून दोनवेळा तालुकास्तरावर तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या तक्रारींचे जागच्या जागी निराकरण केले जाईल. तसेच नागरिकांना ‘प्रशासन आपल्या दारी’ उपक्रमाचा प्रत्यय येईल. उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विशेष तक्रार निवारण दिनामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित राहतील. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळेल. त्यावर तातडीने तोडगा काढला जाईल. हा उपक्रम प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

धरणगावला बुधवारी पहिला तक्रार निवारण दिन

अभिनव योजनेअंतर्गत धरणगाव येथील पंचायत समितीमध्ये बुधवारी, २१ मे रोजी पहिला तक्रार निवारण दिन आयोजित केला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित राहतील. धरणगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here